Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तिसरा

    



       श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तिसरा 

                                मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य

श्री गणेशाय नमः।।  नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथा भाग असा आहे.इश्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी, ऐश्वर्यसंपन्न व  पराक्रमी होता.एकदा तो राजा बरोबर मोठे सैन्य घेऊन शिकारीस गेला असता अनवधानाने एक महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला.राक्षस गतप्राण होऊन पडलेला राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्याच क्षणी भावाच्या मृत्यूचा सूड घेण्याची घोर प्रतिज्ञा त्याने केली.बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायेने आचाऱ्याचे  रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाकगृहात आचारी म्हणून प्रवेश केला. उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्याने राजाचा विश्वास संपादन केला.राजाने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठांना आमंत्रित केले.राजाला धडा शिकविण्यासाठी आचारीरुपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले.अन्नग्रहणाच्या वेळी त्रिकालज्ञानी वसिष्ठांना हे समजले.त्यांनी संतापाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला.राजानेही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरुंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जल घेतले.पण राणीने त्याला अडविले.तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतः च्या पायावर ओतले.त्याक्षणी राजाचे दोन्ही पाय काळे पडले त्यामुळे त्याचे  कल्माषपाद असे नाव पडले.वसिष्ठांनीही आधीच सर्व वृत्तांत जाणून दयाबूद्धीने राजास उःशाप दिला."बारा वर्षांनी तू राक्षस योनीतुन मुक्त होऊन पुन्हा राजा होशील."

राजा राक्षस होऊन अरण्यात फिरु लागला. एके दिवशी भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने करूण स्वरांनी त्याला जीवनदान देण्याची विनंती केली.पण त्याला तिची दया आली नाही. ती ब्राह्मणी आक्रोश करीत असतानाच त्याने तिच्यासमोर तिच्या पतीला  ठार करून मारून खाऊन टाकले. संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने  राजाला शाप दिला,"शापमुक्त होऊन तू पुन्हा राजा झालास की कोणत्याही स्त्रीशी संग करताच तुझे प्राण निघून जातील" आणि पतीच्याअस्थी  गोळा करून त्यासमवेत  ब्राह्मणीने अग्निप्रवेश केला.राजाला अतिशय वाईट वाटले तो विमनस्क झाला.बारा वर्षे पूर्ण होताच पूर्वरूप प्राप्त होऊन तो नगरात परतला.पत्नी दमयंतीला टाळू लागला.आपल्या पतीचे काहीतरी बिनसले आहे हे त्याच्या चाणाक्ष पत्नीने ओळखले.मग राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला.तिलाही अतिशय वाईट वाटले.त्याने वसिष्ठांची भेट घेऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला दिव्य  पुत्रप्राप्ती झाली.वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती.राजा मनोमन उबगला आणि राजविलासांचा त्याग करून अरण्यात गेला. पूर्वी घडलेली ब्रह्महत्या पिशाच्चरूपाने त्याच्यामागे लागली होती. शापित राजाला वनात हिंडता हिंडता गौतमऋषी भेटले .राजाने आपली सगळी हकीकत गौतमऋषिंना सांगितली.ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या आईच्या पूजेसाठी कठोर तपसाधनेने शिवाचे आत्मलिंग आणि अपर्णा वरदान म्हणून मिळविली. अपर्णा हि विष्णूची भगिनी असल्याने विष्णूने मोठ्या युक्तीने अपर्णेची सुटका केली.जिथे महादेवी रावणाच्या खांद्यावरून उतरली तिथे शक्तीपीठ भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली. संतापलेल्या रावणाचे शिवाने, "पुढे विष्णूने आपल्या अंगावरील मळापासून निर्माण केलेली पार्वतीइतकीच सुंदर स्त्री मयासुराची कन्या म्हणून जन्म घेईल व त्याची पत्नी होईल" असे सांगून सांत्वन केले. देवांनी शंकराचे आत्मलिंग राक्षस लोकांत जाऊ नये म्हणून गणेशाची प्रार्थना केली. वाटेत जात असताना ईश्वरी मायेने रावणाला लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. त्यावेळी तेथे गणेश गुराख्याच्या रूपाने तेथे होता. रावणाने ते लिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊन ते भूमीवर न ठेवण्याविषयी बजाविले. ईश्वरी कृपेने रावणाची लघुशंका संपता संपेना. गणपतीने ठरल्याप्रमाणे तीन वेळा रावणाला हाक मारून आपल्या पित्याचे ते आत्मलिंग  पृथ्वीवर ठेवले  व तो गायिंसह अदृश्य झाला. रावणाने ते उचलण्याच्या खूप प्रयत्न केला पण ते लिंग कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले. हेच शिवपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. 

गौतमऋषिंनी राजाला अजुन एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली.ती अत्यंत कुरुप व जन्मांध होती तिचे मरण जवळ आले होते इतक्यात गौतमांना तिला नेण्यासाठी आलेले दिव्य विमान दिसले. शिवाने पाठविलेले विमान पाहून गौतमांना आश्चर्य वाटले व त्यांनी शिवदूतांना याबाबाबत विचारणा केली. त्यांनी तिचा पूर्व वृतांत असा सांगितला, पूर्वजन्मी हि अत्यंत रूपवान ब्राह्मण कन्या होती .तिचे नाव सुमित्रा असे होते.तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले.पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले. शारीरिक भूकेसाठी ती वाममार्गाला लागली .पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही.शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणाने तिला घराबाहेर काढले. दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्राबरोबर तिने लग्न केले. त्याच्या घरी मद्यमांसाला तोटा नव्हता. तीही मांसभक्षण व मद्यपान करू लागली. एकदा नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले.लक्षात येताच ती शिव शिव करुन ओरडली .कुकर्मे केल्यामुळे यमदूतांनी तिला अनंत यातना दिल्या. फक्त एकदा शिव शिव म्हणाल्यामुळे पुढील जन्मात ती अन्य पशूंच्या जन्मास न जाता चांडाळीण झाली पण जन्मांध होती. ती अनाथ होती व कुष्ठरोगहि झाल्याने तिला जीव नकोस झाला होता.एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रास निघाली.भूकेने व्याकूळ झाली.एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले .हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले.ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले.अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. लोकांसोबत नामस्मरण झाले. त्या पुण्याईने तिची पूर्वजन्मीचे सर्व पातके नाहीशी होऊन  तिला शिवलोक मिळाला.गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले.त्यांनी राजाला गोकर्ण  महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री जाऊन राजाने शिवरात्रीस उपोषण केले, शिवपूजन केले. शेवटी तो शिवलोकास निघून गेला.असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा! धन्य धन्य ते शिवमंदिर ज्याच्या पूजनाने राजाला सरूपता मुक्ती मिळाली.

                                                   ।।सांबसदाशिवार्पणमस्तु।।

फलश्रुती: या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम प्रहरी पठणाने भूतबाधा नाहीशी होईल.याचा उपयोग घरातील कर्त्या माणसाने करावा.

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...