Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा

 


   श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौथा  

                               विमर्शन व कुमुद्वती,चंद्रसेन व श्रीकर.

श्रीगणेशाय नमः।। सूत सांगतात,फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता.तो निर्दय असून अधर्माने वागायचा.मात्र त्याची शिवभक्ती अपार होती.एके दिवशी त्याच्या पट्टराणी कुमुद्वतीने त्यास विचारले, "शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे ?" तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला.मागिल जन्मात पंपा नगरीत तो कुत्रा होता.एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर ऊभा राहिला. पण द्वारपालाने त्याला काठीने मारले.मार चुकविण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली.थोड्या वेळाने तो परत मंदिरासमोर आला द्वारपालाने रागाने त्यास बाण मारला .शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला.त्या पुण्याईने आज हे वैभव तो उपभोगत आहे.श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून तो आज हे दोषपूर्ण आचरण करतो.

राणी कुमुद्वतीने स्वतः च्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले .तेव्हा राजाने तिला सांगितले, की तु मागील जन्मी कपोती होतीस,एकदा मांसाचा तुकडा चोचीत घेऊन जात असता तुझ्या मागे ससाणा लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेर्या घालू लागलीस,त्यावेळी शिवलायला तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या.दमून तू मंदिराच्या शिखरावर बसलीस त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घालून तुला ठार केले.त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला.उत्सुक होउन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले.तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील सात जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेऊन अंती सर्व प्रकारच्या दोषांपासून  मुक्त होऊन शिवपद प्राप्त करणार असल्याचे सांगितले.

सूतमुनीनी पूढे शिवभक्तीची थोरवी सांगणारी चंद्रसेन राजाची कथा सांगितली.

चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता.मणिभद्र त्याचा जिवलग मित्र होता .राजा सद्विवेकी असलेने तो अजय होता .एके दिवशी मणिभद्राने राजाला एक सूर्यासारखा तेजस्वी असा अजब मणी भेट केला. त्याच्या दर्शनाने अनेक रोग बरे होत. अष्टधातूना स्पर्श होताच त्यांचे सोन्यात रूपांतर होई. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली.त्याला अनेक शत्रु निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तीशाली आहे असे समजून सर्व राजे एकत्र येऊन त्याला विरोध करुन युद्ध करण्यास तयार झाले.राजाला युद्ध नको होते. आपला सर्व भार महाकाळेश्वरावर टाकून तो शिवशंभोला शरण गेला.बाहेर प्रधानाच्या नेतृत्वाखाली  युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवाराधना सुरु होती.ती पहाण्यासाठी जनता लोटली होती.त्यातच एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या मुलाला श्रीकरला कडेवर घेऊन उभी होती. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले.श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली.इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली.त्याने बाजूच्या उजाड झोपडीत दगडमातीचे शिवलिंग करुन पूजा करण्यास सुरुवात केली. तो पूजेत इतका तल्लिन झाला की आई हाक मारते आहे याकडे त्याचे लक्ष नव्हते.त्याच्या आईने येऊन पाहिले तर हा शेजारच्या ओसाड झोपडीत ध्यान लावून बसला होता.तिने त्याला जेवायला चलण्यास सांगितले पण तेही त्याला ऐकू गेले नाही. तिने रागाने त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून लावली व त्याचा हात धरून त्याला उठवू लागली.आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला. लोटांगण घालू लागला ."माझी पूजा मोडली आता मी प्राणत्यागच करतो" असे म्हणून आक्रोश करू लागला. त्याचे भलते आचरण पाहून संतापून आई त्याला तिथेच सोडून गेली व आपले जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरूण  घेऊन झोपली.पूजा मोडल्याने दु:खी झालेला श्रीकर रडत रडत उजाड झोपडीत विलाप करीत होता. त्याचा मनोभाव पाहून शंकराने पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित शिवमंदिर निर्माण केले.डोळे उघडताच श्रीकाराला मोठे आश्चर्य वाटले. त्याने गाभाऱ्यात जाऊन तयार असलेल्या राजोपचारसामग्रीने भक्तिभावाने  शंकराची षोडशोपचारे पूजा केली.प्रसन्न होऊन महादेवाने त्यास दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले . श्रीकरने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करुन तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला.आईने शिवशंभोला नमस्कार केला.त्याची भक्ती पाहून तिला भरुन आले.तिला आपल्या मुलाच्या भक्तीचे खूप कौतुक वाटले. न राहवून तिने ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितली.राजा ही आश्चर्य चकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी त्वरेने तेथे आला.रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले.त्याने श्रीकराची स्तुती करून मनोभावे शंभोला नमस्कार केला.ही घटना वाऱ्यासारखी पसरली . बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रुराजांनाही समजली.त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले.त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभोचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली.चंद्रसेनाला ही आनंद झाला.शंभो प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. सर्व राजांनी लहानग्या गोपबाळाचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले.त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करुन त्याला "नम: शिवाय" या मंत्राचा उपदेश करून अनुग्रहित केले.हनुमंताने श्रीकराला त्याच्या आठव्या पिढीत नंद राजाचा जन्म होईल. जो भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण याचा धर्मपिता होईल.असे सांगितले. तसेच अनेक शुभाशीर्वाद देऊन हनुमान अंतर्धान पावला.  रामभक्त हनुमान ज्याचा सदगुरु आहे त्याला भय कसले.श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले.व अंती परमगती मिळून ते शिवपदास पोहोचले.

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने  दारिद्र्य व शत्रुचे भय नष्ट होईल संपदा मिळू लागेल. स्मरणशक्ती वाढेल.

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...