Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा

 


     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा   

                               ब्रह्मराक्षस,ब्राह्मण आणि शबर दांपत्याचा उद्धार.

श्रीगणेशाय नमः।।
जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण, संसारभय याचे अस्तित्व नसते.याची कथा सुत सांगतात.

वामदेव व ब्रह्मराक्षस.
सूत म्हणतात,
वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता.तो अरण्यात वास करायचा. सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा. इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौनव्रत धारण करुन असायचा. निराहार राहून तो सर्वत्र निर्हेतुक हिंडायचा.एके दिवशी अरण्यातून भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला. त्या ब्रम्हराक्षसाचे  कपाळ शेंदुरनी माखलेले असून त्याच्या मुखातून भलीमोठी जीभ बाहेर लोंबत होती. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो तहान भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने वामदेवाला जोरात आवळले. पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असूरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उध्दार झाला हे वामदेवा कळले पण नाही.पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने त्याची मती पालटली. वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागतात हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्त्विक वृत्तीचा झाला पण आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका राक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान  नव्हते. वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली. त्या तपस्व्याच्या स्पर्शाने त्या राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले. तो  वामदेवाला वंदन करून म्हणाला, "गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे.तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो. तथापि तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहेत त्यात माझ्याकडून जी महाभयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो. स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो. माझ्या छळ आणि स्वैराचाराला कंटाळून ब्राम्हणांनी आणि प्रजाजनांनीही पलायन केले. शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला.माझ्या मृत्युनंतर मला यमलोकी माझ्या दूराचारांची शिक्षा म्हणून भयंकर नरक यातना दिल्या. गुरुदेव माझ्या प्रत्येक दुष्कृत्याची मला इतकी भयंकर शिक्षा देत होते कि ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या यातना देहाला मरणही येत नव्हते. एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन न झाल्यामुळे मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले. तेथे माझे हाल हाल केले अशा प्रकारे तीन हजार वर्षे भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही. मग मी व्याघ्रयोनीत जन्माला आलो. वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, कासव, उंदीर असे पशुपक्षांच्या योनीत तेवीस जन्म घेतले. नंतर दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मला मिळाला आहे, स्वामी आज तुमच्या दर्शन व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे सहस्त्र जन्म आठवताहेत ही केवढी कृपा. संतांचे महात्म्य किती थोर आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली."   ते ऐकून वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हराक्षसाला भस्माचे  महत्त्व विशद करणारी एक कथा सांगितली. तो म्हणाला, "एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्याभिचारी होता. त्याचे एका क्षुद्र स्त्रीशी संबंध होते. हि गोष्ट तिच्या नवर्‍याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राम्हणाचा वध केला आणि प्रेत गावाबाहेर टाकून दिले.  ब्राह्मणाच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यमदूतांनी  त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली.त्या प्रांगणात चिताभस्म विखुरले   होते.एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले. थोड्यावेळाने कुत्रा ब्राम्हणाच्या प्रेतापाशी गेला. त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच  भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली आणि यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूत विमान घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने  ब्राम्हणाला शिवलोकी नेले. भस्म  हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्म्य अवर्णनीय आहे. ब्रह्मराक्षसाने  भस्मधारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवांनी शंकराने देवांना जो  भस्ममहिमा सांगितला होता तो ब्रह्मराक्षसाला सांगितला.," वाळलेले गोमय जाळून  मिळालेले  भस्म सर्वोत्तम होय.ते भस्म शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळाच्या खालून वर असे उभे लावावे. नंतर मस्तकाभोवती लावावे. तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे. याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात. मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे. अशाप्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रीयांशी गमन, मदिरापान, अभक्ष्यभक्षण, गोहत्या, ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात. वामदेवाच्या तोंडून भस्ममाहात्म्य ऐकताच ब्रह्मराक्षस दिव्यरूप पावला.एक दैदिप्यमान विमान येऊन त्याला शिवलोकी घेऊन गेले  तेथे तो शिवस्वरूप होऊन राहिला.

भस्मधारणेचे  महात्म्य वर्णन करणारी अजून एक कथा सूत पुढे सांगतात.

शबर दांपत्याचा उध्दार.
सूत सांगतात,जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभोची कृपादृष्टी असते. पांचाळ देशाचा अति पराक्रमी राजा सिंहकेतू एकदा आपल्या सैन्यदलासह अरण्यात शिकारीसाठी गेला होता.काही भिल्लही त्याच्याबरोबर होते. ते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिल्लाला पडके शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते. ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा म्हणाला, "हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे. त्याचा देखावा नको." भिल्ल  म्हणाला, "महाराज मी हे शिवलिंग घरी नेतो पण त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही समजावून सांगा." राजाने त्याला पूजेचा साधा विधी सांगितला आणि पुढे म्हणाला शंकराला चिताभस्म अतिशय प्रिय आहे. रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम. निष्ठावान शिवभक्त असतात ते शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात. ही गोष्ट राजांनी माहितीसाठी म्हणून सांगितली. कारण रानावनात राहणाऱ्या भिल्लास  रोज नवे चिताभस्म न मिळून त्याची पंचाईत होईल म्हणून राजाने आधीच भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला होता पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण चिताभस्म अर्पण करूनच नित्य पूजा करायची असे ठरवले. एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे पती-पत्नी शंकराची नित्यपूजा करू लागले. भिल्ल नगरातील स्मशानातून  रोज नवे चिताभस्म घेऊन येऊन शंकराला वाहायचा. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत. अशाप्रकारे कित्येक दिवस त्यांचे पूजन चालले होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहण्याचे ठरविले. त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही. त्यामुळे तो निराशेने घरी आला त्यावर शबरीने भिल्लाला मी स्वतः दहन करून घेते  तेच चिताभस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांबपूजन करा असे सांगितले आणि शंकराचे स्मरण करून तिने स्वत:च्या वस्त्रांना अग्नी लावला. ती अग्नीत जळून भस्म झाली. आपल्या आराध्य दैवतेच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले. चिताभस्म घेऊन भिल्ल पूजास्थानी आला आणि आसन मांडून त्यांनी शंकराची पूजा केली. त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला. शबराचा एक नियम होता तो शिवपूजेतून कधीही उठत नसे. त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला की आपली पत्नी आज हयात नाही याचे त्याला स्मरण नव्हते. तो आपल्या पत्नीला सवयीने हाका मारून नैवेद्य  आणण्याविषयी  सांगू लागला. तर काय आश्चर्य हाकेसरशी पत्नी धावत आली. ती अप्सरांप्रमाणे दिव्य रूप झाली होती. त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन करून मनोभावे स्तवन केले. शबराचे रूपही पालटून तो शिवभक्त शबर शंकरासारखा दिसू लागला होता. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून शिवलोकी नेले.  हे वृत्त सिंहकेतुला कळताच त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला मी त्या शबराला  'चिताभस्माने शिवपूजन कर.' असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले. धन्य धन्य तो शबर! धन्य धन्य ती शबरी! धन्य त्यांचा निस्सीम भाव! एकनिष्ठ भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं. या घटनेतून प्रेरणा घेऊन सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण, शंकराचे भजन पूजन, शिवाप्रित्यर्थ सोमवार, प्रदोष, शिवरात्र व्रतांचे आचरण, दानधर्म करणे, सन्मानाने वागणे यात धन्यता मानू लागला. त्यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्याही जन्माचे कल्याण झाले व अंती तो शिवलोकी गेला.

असा हा शिवमहिमा अपरंपार आहे.
 
                                                            ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती:  या अध्यायाच्या पठणाने पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील. पूर्वपापनाश होईल

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...