Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा

                                   

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा 

                                       रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य. भद्रसेन आख्यान.

श्रीगणेशाय नमः।।
रूद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान.
 महामुनी सूत यानी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले तो म्हणाला,' श्रोतेहो जे लोक अंगाला भस्म लावतात. रुद्राक्ष धारण करतात. त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रैलोक्यात धन्य होत. जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच! रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्या विषयीचा एक इतिहास सांगतो. भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा अतिशय प्रजाहितदक्ष, विवेकसंपन्न, ज्ञानी होता. त्याची पत्नीही सुंदर, धर्मशील पतिव्रता व मृदुभाषीणी होती. त्याचा प्रधान ही त्याच्यासारखाच विद्वान, सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता. भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त असून ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करत असत. अनेक शिवअनुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. ते दोघेही प्रेमळ, वितरागी, सत्संगतीत रममाण होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते. त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या पण ते दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत. सर्वांगाला भस्म लावत असत .शंकराची पूजा पाहणे, नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती. त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटून ते दोघेही चिंतामग्न व्हायचे. अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले. पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासाचे पिता होत.ते त्रिकाल ज्ञानी होते. कुलगुरू पराशर आल्याचे कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला. त्यांची षोडशोपचारे पूजा करून आलेल्या इतर सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले .त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले मग पराशर यांना राजानी आपली चिंता सांगितली. तो म्हणाला, ' गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म व प्रधानजींचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही. ते विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलत नाही. शंकराचे ध्यान, अंगावर भस्म लावणे रुद्राक्षांच्या माळा घालणे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून मला ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही.' राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले .पराशर यांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले व अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, 'राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो ऐक.  

 पूर्वी काश्मीर देशातील नंदिग्राम नावाच्या नगरात  महानंदा नावाची अतिशय श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न व सौंदर्यवती वेश्या राहात होती. तिच्या घरी तिची आई व भाऊ रहात असत. ती भाग्यवान होती. तिच्या घरी राजे-महाराजे व श्रीमंत लोक येत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे. ती वेश्या असूनही पतिव्रतेसारखी वागायची. एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची. त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष, शिवरात्री आदी व्रते करायची. नेहमी अन्नछत्र चालवायची. याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची. महानंदने आपल्या घरात एक कोंबडा व माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून  तिने त्यांना नाचायला शिकवले होते. तिने आपल्या नृत्य शाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. कुक्कुट व मर्कट त्यांना ती तिथेच बांधून ठेवत असे. त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशाप्रकारे तिच्या संगतीने त्या मुक्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे. एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सदनी आले. तिने हसून त्या सुंदर सौदागाराचे  स्वागत केले. त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदेचे  लक्ष वेधले गेले. ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले. तिने तीन दिवस सौदागाराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला. सौदागराने ते मान्य करून वस्त्रांतून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले आणि ते शिवलिंग महानंदेकडे देऊन त्याने तिला सांगितले, ' हे लिंग मला प्राणप्रिय आहे. जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. तात्काळ अग्नी प्रवेश करीन.'  महानंदेने ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले होते. रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले. महानंदेच्या धैर्याची  कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लीलेने नृत्य शाळेस आग लावली. थोड्याच वेळात अग्नीने नृत्य शाळेला चहुकडून वेढले हे वृत्त कळताच महानंदा धावत नृत्यशाळेकडे धावली. तिने भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते वनात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करून अग्नी शांत झाला. सौदागराने तिला आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली. ऊर  पिटून आक्रोश करू लागली. लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यथित झाला आणि त्याने शुष्क काष्ठे रचून अग्नी प्रदीप्त केला.ओम नमः शिवाय म्हणून अग्नीकुंडात उडी घेतली. महानंदने स्वतःच्या धारणे प्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगमन करण्याचे ठरविले. तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितले. 'हर हर शंकर!' असा नामघोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिताग्नीत  उडी घेतली पण तिला वरचेवर झेलून त्या अग्नीतून कैलासनाथ प्रकट झाला व तिला म्हणाला, "महानंदा तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रुपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू वर माग.  महानंदने माझ्यासह नगराचाही उद्धार कर. असे शंकराकडे मागितले. तेव्हा तथास्तु असे आशिर्वचन बोलून शंकर अंतर्धान पावला. शिवगणांनी महानंदा ,तिची माता, बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले. त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले.  महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले हे राजा महानंदने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला. ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार-प्रसार करून तुमचाही उद्धार करतील.' त्याच वेळी राजा भद्रसेनाच्या मनात पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. 

पराशर म्हणाले, ' राजा मी येथे खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही.'  राजांनी त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले,  ' राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्युयोग आहे.' ते ऐकताच राजा व राणी दुःख सागरात बुडाले. पराशर ऋषींनी  राजाला सावरले व त्याला म्हटले, 'रुद्राध्यायापेक्षा  गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही. याहून मोठे साधन नाही. रुद्राध्यायाच्या नित्य पठणाने सर्व विघ्ने निवारण होतात. त्यांनी रुद्राध्यायाचे   महत्त्व विशद करून भद्रसेनाला म्हटले, "राजा चिंता करू नकोस. आजपासून सात दिवस शंकराला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने कर. म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग्य  टळेल.' राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाचे आचार्य व्हावे अशी पराशर मुनींना विनंती केली. पराशरांच्या देखरेखीखाली रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या एक हजार सच्छिल ब्राह्मणांनी रुद्रावर्तनास प्रारंभ केला. एक हजार घटांत  मंदाकिनीचे पाणी भरून आम्रपल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते.

 सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना माध्यान्हसमयी मृत्यूसमय असल्याने राजपुत्र सुधर्म एकदम मूर्च्छित पडला. त्याची मरणोन्मुख अवस्था पाहून राजा घाबरला. पराशर मुनींनी त्याला धीर देऊन रुद्राने अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिंपडताच राजपुत्र सावध झाला. पराशरानी राजपुत्राला तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला, ' गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला घेण्यासाठी आला होता पण कालपुरुष मला घेऊन जात असता  पंचवदन, दहा भुजांचे सर्वांगी भस्म लावलेले  दिव्य पुरुष तेथे धावत आले. त्यांनी मला त्याच्या तावडीतून सोडविले. पुढे काय झाले ते मला माहित नाही. कारण मला जाग आली.' ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो शंकराचा जयजयकार करू लागला. देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजाने सर्व आमंत्रित ब्राम्हणांना दिव्य वस्त्रालंकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला. सर्व याचकांना संतुष्ट केले त्याच वेळी त्या आनंदोस्तवात देवर्षी नारदांचे आगमन झाले. सर्वांच्या आनंदाला पारावार  उरला नाही. दिव्य आसनावर बसवून भद्रसेनाने त्यांची पूजा केली.

नारद म्हणाले,' राजा येथे येत असता मी एक गोष्ट पाहिली. पाच मुखे व दहा हात असलेली अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान!  ज्यामुळे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला. वीरभद्र मृत्यूला विचारीत होता, 'तू कोणाच्या आज्ञेने सुधर्माला नेत होतास ? तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना ? भद्रसेनाचा पुत्र दीर्घायुषी असून  असून तो सार्वभौम राजा होणार आहे.' हे ऐकून यम विचारात पडला आणि त्यांनी चित्रगुप्ताकडे चौकशी केली तो म्हणाला त्याला बाराव्या वर्षी मृत्यू होता पण रुद्रानुष्ठानाच्या मह्तपुण्याईने कुयोग टळला आहे. यमाने आपल्या अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले.' भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले. त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने  सहस्त्र रुद्रावर्तने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला. पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशर मुनींनी  राजाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. पुढे  सुधर्मास राज्याभिषेक करून व तारकास  युवराजपद देऊन भद्रसेन प्रधानसोबत तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले.त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन कैलासक्षेत्री राहिले. 

रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्याची शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो त्या रुद्राचे महत्व सांगणाऱ्या अध्यायाचे नित्य पठण केल्यास मनुष्य निर्दोष होतो. शिव चिंतनाने शिवस्वरूप होतो या भद्रसेन आख्यानाचे  जो कोणी वाचन करील त्याला दीर्घायुष्य,उत्तम संतती प्राप्त होईल. त्याला कळिकाळाचे  भय राहणार नाही. त्याला शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल.

                                                     ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: रुद्राध्यायाच्या पाठाइतकेच याचे महत्त्व आहे या अध्यायाच्या पठणाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल.

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...