Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा

                                   

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा  

                                 श्रवणरहस्य,बहूलेचा उध्दार, भस्मासूर वध.


श्रीगणेशाय नमः।।
सूत सांगतात,शिवकिर्तन नित्य ऐकावे.जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात.नित्य शिवस्मरण करावे.

बहुलेचा उध्दार.
श्रवणभक्तीचे महत्त्व विशद करणारी एक कथा सूतांनी  सांगितली, ' दक्षिणेकडे बाष्कल  नावाचे एक गलिच्छ गाव होते. तेथील सर्व लोकं अनाचारी, व्यभिचारी,नीतिमत्तेची जराही चाड नसलेले व धर्म सोडून दिले असे होते. त्या गावात विदुर नावाचा एक कामलोलुप  ब्राह्मण राहत असे.त्याची पत्नी बहुला हीसुद्धा व्याभिचारीणी होती. एके दिवशी ती आपल्या जाराशी एकांतात रममाण झाली असता विदुराने तिला पकडले. जार पळून गेला. विदुराने  बहुलेला पुष्कळ मारले.लाथाबुक्क्यांनी कुदवले. ती संतापून नवऱ्याला म्हणाली, ' तू वेश्येकडे  जातोस मग मी जारकर्म केले म्हणून काय बिघडले.' विदूर म्हणाला , 'या जारकर्मातून  मिळालेले धन तू मला देऊन टाक.' पत्नीने नकार देताच त्याने तिला मारझोड करून तिच्या अंगावरचे सर्व दागिने, घरातले द्रव्य घेतले आणि ती सर्व संपत्ती आपल्या आवडत्या वेश्येला देऊन टाकली. त्या वेश्येने ते द्रव्य अलंकार आपल्या प्रियकराला देऊन टाकले. विदूर आणि बहुला यांचे जीवन पापकर्मे करण्यात व्यतीत झाले. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला कुंभीपाक नरकात घालून अतोनात छळ केला. त्यानंतर त्याला फारच भयंकर पिशाच्चरूप प्राप्त झाले. तो विंध्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात संचार करू लागला. तहान भुकेने व्याकूळ होऊन अरण्यातून फिरायचा. अंगाला आळोखे पिळोखे द्यायचा. झाडाच्या फांदीवर स्वतःला उलटे टांगून घ्यायचा अशाप्रकारे तो विदुर ब्राम्हण आपल्या पाप कर्माची फळे भोगत होता. बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागली. तिला एक मुलगा होता पण तो कोणापासून हे तिला माहीत नव्हते. काही दिवसानंतर शिवरात्रीच्या पर्वी  ती यात्रेकरूंसमवेत गोकर्ण क्षेत्रात गेली. तेथे लोकांबरोबर बहुलेनेही स्नान केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती पुराण ऐकण्यास बसली. जारकर्म करणार्‍या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पुराणिक बुवा वर्णन करून सांगत होते. ते ऐकून बहुला घाबरली. आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागली. तिची अवस्था बघून पुराणिकाला दया आली. त्याने सांत्वनपर शब्दांनी तिला धीर दिला.
आपण केलेली सर्व पापकर्मे तिने त्याला रडत-रडत कथन केली व पुढे म्हणाली, ' गुरुजी या  दुष्कृत्यांबद्दल यमदूत  मला अनंत यातना देतील. त्या दु:खाच्या कल्पनेने  माझ्या अंगाचा थरकाप होत आहे. आता मी कोणाच्या आश्रयास जाऊ. कोणाचे पाय धरू?' पुढे ती पुराणिकाला म्हणाली, 'तुम्ही मला गुरुस्थानी आहात. मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा.' तो पुराणिक ज्ञानी असल्याने त्याने बहुलेला 'नमः शिवाय' या मंत्राचा उपदेश केला .तिला शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली. तिने अत्यंत आदराने तो ग्रंथ  श्रवण  केला. अन्य ग्रंथही ऐकले. सत्संगतीने ती विरक्त होऊन तिचा मोह गेला. चित्तातील उद्वेग नष्ट झाला. नामस्मरणाच्या प्रभावाने तिची सर्व पापे, दोष जळून गेले. बहुला श्रवण भक्तीने पावन झाली. अहोरात्र शिवकीर्तन करून ती मुक्त झाली. बहुलेला सत्संगती आवडू लागली. गोकर्ण क्षेत्री राहून ती जटा वाढवून वल्कले धारण करून मृगाजीन नेसू लागली. आप्तजन घर परिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरु सेवेत रममाण झाली. या साधनेने तिची त्रिदेहशुद्धी झाली. शंकर तिच्यावर प्रसन्न होऊन त्याने दिव्य विमान पाठवून तिला शिवलोकी नेले. एवढी पापिणी बाहुला पण शिवकृपेने तरून गेली. ते पाहून चौदा  भुवनातील लोक थक्क झाले. शिवासन्मुख गेल्यावर तिने शिवपार्वतीची स्तुती केली.भगवतीने  प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले.तेव्हा तिने आपल्या पतीला अधोगती पासून सोडवून पावन करण्याविषयी विनंती केली. अंबेने दिव्य दृष्टीने पाहतात तिला बहुलेचा पती विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात पिशाच्च होऊन भटकत असलेला दिसला.अंबेने बहुलेला  सांगितले की "तुझा पती विंध्याचलावर पिशाच्च योनीत भयंकर दु:खात आहे. तुंबराबरोबर जाऊन तू त्याला शिवकथा ऐकव म्हणजे त्याची सर्व पापे जळून जातील. मग त्याला येथे घेऊन घेऊन ये.' जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला तुंबराबरोबर विंध्य पर्वतावर गेली. तुंबराने बलपूर्वक तिच्या पतीला पकडून एका वृक्षाला बांधले. पिशाच्च झालेल्या विदुरासमोर तुंबर शिवलीलांचे मधुर गायन करू लागला. त्या प्रभावाने विदुराला पूर्व स्मृती येऊन ' तो मला सोडवा! मला सोडवा!' अशी विनंती करू लागला. तुंबराने त्याला मुक्त करताच  त्याने तुंबराचे पाय धरले व आपला उद्धार केला म्हणून बहुलेचीही प्रशंसा केली. तुंबराने त्याला ' नमः शिवाय ' या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्राच्या जपाने तो दिव्य रूप पावला.  

तेवढ्यात एक तेजस्वी विमान तेथे आले. त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले. शिवगणांनी विदुराला सन्मानाने शिवाकडे नेले.विदुराने शंकराला वंदन केले. विदुर आणि बहुला ही उभयता शिवस्वरूपी  एकरूप झाली. 

भस्मासूर वध.
सूत सांगतात,
 सूत  म्हणाले, ' एकदा प्रदोष समयी  शंकर आपल्या अंगाला भस्म लावीत होता. तेव्हा त्याच्या हाताला एक खडा लागला त्याने तो बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवताच त्यातून एक असूर उत्पन्न झाला. शंकराने भस्मासूर असे त्याचे नाव ठेवले. भस्मासुराने शंकराला वंदन करून सेवा देण्याविषयी प्रार्थना केली.  तेव्हा शंकराने त्याला दररोज यावेळी नवीन चिताभस्म आणून देण्याची सेवा दिली. भस्मासुर नेमाने पृथ्वीवर शिवभक्तांच्या चितेचे भस्म शंकराला आणून देऊ लागला. आपले काम चोख करू लागल्यामुळे भस्मासुर शंकराला प्रिय झाला पण शंकराची प्रसन्नता लाभल्यामुळे तो उन्मत्त होऊन त्याच्या मनात आसुरी  विचार येऊ लागले. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे व सर्वात प्रभावी असुरराज्य स्थापन करावे असे मनोराज्य तो रचित होता. एकदा तो कपटबुद्धीने   शंकराकडे गेला व म्हणाला, 'स्वामी मला रोज पुष्कळ हिंडावे लागते. तसेच मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी ज्याच्या  मस्तकावर हात ठेवीन त्याचे  भस्म होईल असा मला वर द्या. त्या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल.' आपल्याबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून भोलेनाथाने त्याला वर देण्याचे ठरविले. पार्वती, षडानन, गजानन, वीरभद्र व नंदी या सर्वांनी शंकराला हा वर देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण शंकराला भस्मासुराविषयी विश्वास असल्यामुळे त्याने भस्मासुराला अपेक्षित वर दिला.

 शंकराच्या प्रसादाने भस्मासुराला विवेक न राहता तो गो,ब्राह्मण, संत, सज्जन ऋषी, यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला. त्याने भयंकर नरसंहार केला. त्याच्या भीतीने सर्व ब्राह्मण व प्रजाजन पर्वतांच्या गुहांच्या आश्रयास जाऊन कुठेही बाहेर फिरकेनासे झाले. महावीर व पराक्रमी योद्धाचे  त्याच्यापुढे काहीही चालेना. भस्मासुर शंकराला चिताभस्म देण्याची सेवा विनम्रपणे करत असल्याने कैलासनाथाला  त्याच्या कारस्थानांचा जराही सुगावा लागला नाही. भस्मासुराचा पृथ्वीवरील उपद्रवामुळे ऋषी व प्रजाजन इंद्राला शरण गेले. इंद्र धास्तावून त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व शेवटी ते सर्व जण विष्णूकडे गेले. विष्णु सर्वांना घेऊन शंकराकडे गेला व सर्व हकीकत त्याने  त्याला सांगितली. शंकर हसून म्हणाला, 'भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे. तुम्ही निश्चिंत होऊन स्वस्थानी जा.' तो असे बोलत असतानाच भस्मासुर अकस्मात भस्म घेऊन तेथे प्रकट झाला  व त्याने तुच्छतेने मान उडवून म्हटले, 'आज जे येथे आले आहेत त्या सर्वांचे मी उद्या भस्म करणार आहे.' ते ऐकून शंकर क्रोधाने म्हणाला ,' अरे अधमा, मी  दिलेल्या वराने केवढा नरसंहार केला. माझ्याशी प्रतारणा करताना तुला जराही वैषम्य वाटले नाही.' तेव्हा संतापाने भस्मासूर म्हणाला, ' तुझी सुंदर स्त्री मला दे नाहीतर मी तुझे आताच भस्म करतो.'  लगेचच  भस्मासूर शंकराकडे धावला. ते पाहून शंकरही अरण्याकडे पळत सुटला. भस्मासुर त्याचा पाठलाग करू लागला. शंकराची अवस्था पाहून चिंताग्रस्त पार्वतीने विष्णूचा धावा केला.आपल्या बहिणीची आर्तता जाणून विष्णूने  निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले व तो भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला. शंकराने एका वटवृक्षाचे रूप घेतले. धापा टाकीत आलेल्या भस्मासुराने मोहिनीला पाहताच तिच्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला. त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली. तिला गाठून तो म्हणाला ,' तू माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले आहेस. तू माझी हो. तू मला वरमाला घाल. मी निरंतर तुझे दास्य करेन.' भस्मासुर आपल्या कह्यात आल्याचे मोहिनीने जाणले व तात्काळ ती म्हणाली, ' मी तुला नक्की वरीन. पण तो वटवृक्ष माझे आराध्य दैवत आहे. लग्नाआधी भावी पतीसोबत  तुझ्यासमोर नृत्य व गायन करीन असा मी त्या वटवृक्षाला नवस केला आहे म्हणून तू माझ्या  समवेत त्याच्यापुढे नृत्य गायन कर. माझ्याप्रमाणेच मुद्राभिनय हस्तसंकेत  व पदन्यास कर. त्यात जराही चूक झाली तर ते दैवत कोपेल व सर्व ब्रम्हांड जाळून टाकेल.' भस्मासुर म्हणाला, 'तुझ्या प्राप्तीसाठी तू सांगशील तसे नृत्य मी करेन.'  भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने तेथे वटवृक्षापशी आणले व आपल्या दैवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली. ते गायन ऐकून गंधर्व, किन्नर, देव अवाक झाले.मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायिकाही तटस्थ झाल्या.
 भस्मासुर तिच्या समवेत नृत्य करीत होता. दोघेही देहभान विसरून नृत्य करीत होते. एका बेसावध क्षणी मोहिनीने  करामत केली. आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला भस्मासुराने तसेच करतात त्याला मिळालेले वरदानच शाप ठरले आणि तो जळून खाक झाला. कार्यसिद्धी होताच मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर प्रकट झाला व हरिहर भेट झाली. देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. शंकराने मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली. शंकराचे वीर्यस्खलित  होऊन जमिनीवर पडले. त्याचे आठ भाग होऊन त्यातून असित , अंगार, चंड,  क्रोध,  उन्मत्त, कपाल,भीषण आणि संहार असे अष्टभैरव उत्पन्न झाले. हे शंकराचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत. भस्मासुराचा वध झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला. हरिहर कैलासावर येताच  अंबिकेने त्यांची प्रसन्न वदनाने पूजा केली. दोघांची नावे एकत्र  गुंफून स्तुती केली व त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला .  

                                             ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने व्यसन,पाप, रोग,दारिद्र्य,दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. 

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...