श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा
कवीचे निवेदन, शंकराचार्य आख्यान, ग्रंथाची फलश्रुती .
कवीचे शिवलीलामृतातील चौदा अध्याय लिहूनही समाधान झाले नाही म्हणून त्याने शंकराला अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली. शिवाने कृपा करून स्फूर्ती दिली. त्याच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाला, "कलीयुगात पाखंडांच्या मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्यरूपे अवतार घेतला. ते चरित्र प्राकृत भाषेत वर्णन कर."
कालडी ग्रामात विद्याधिराज नावाचा एक शुचिर्भूत विप्र राहत असे. शिवगुरू नावाचा त्याचा पुत्र होता व आर्याम्बा ही त्याची पत्नी. या दाम्पत्याने लोकोत्तर पुत्र व्हावा म्हणून शंकराची तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला पुत्र व्हावा असे दाम्पत्याने मागितले. शंकराने, 'तुम्हाला कसा पुत्र हवा?ज्ञानी व अल्पायुषी कि अल्पमती व शतायुषी ?' असे विचारले. त्यावर त्या दाम्पत्याने अल्पायुषी व ज्ञानी पुत्र मागितला. शंकराने तथास्तु म्हटले. अंशावतार म्हणून शिवगुरू व आर्याम्बा यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आला. शंकराच्या बालपणीच शिवगुरू मरण पावला. आर्याम्बाला अतिशय दुःख झाले. पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला. शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता. एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला.त्याला वाचविण्यासाठी आर्याम्बाने आरडाओरड केली. तेव्हा शंकर म्हणाला, 'आई, मगर म्हणते. संन्यास घेईन म्हण. नाहीतर मी तुला सोडणार नाही." तेव्हा आर्याम्बाने ते कबूल केले. तात्काळ मगरीने त्याला सोडले. धावत काठावर येऊन तो आईच्या पाया पडला. तेव्हा, ' माझ्या अंत:काळी तरी मला येऊन भेट.' असे तिने मुलाला सांगितले. शंकराने तिला तसे वचन दिले.
ओंकार मांधाता या क्षेत्रात येऊन शंकराने संन्यास घेतला. गोविंद यती हे त्याचे गुरु व गौडपादाचार्य हे परमगुरु. बद्रिकाश्रमात त्याने शास्त्राभ्यास व वाराणसी येथे त्याने भाष्यरचना केली. नंतर तो वाद करून सर्व मतांपेक्षा अद्वैत मत श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी दिग्विजय करण्यास निघाला. त्याने भारतभर अनेक पंडितांना वादात जिंकले आणि आपले शिष्य केले. एकदा भिक्षेची सोय म्हणून त्याचे शिष्य झालेल्या शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने एका कासाराच्या दुकानापुढे भिक्षा मागितली. कासाराने शंकराच्या हातात काचेचा रस दिला.शंकराने तो उष्ण रस पिऊन टाकला. ते पाहून चार शिष्यांना सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले. मोक्षदायक ज्ञानमार्ग जगात रूढ करण्यासाठी शंकराचाऱ्यांनी अनेक पंडितांशी वाद करून अद्वैतमत प्रस्थापित केले. उत्तर देशात महिष्मती नगरात मंडनमिश्र नावाचा एक कर्मठ पंडित राहत होता. शंकराचार्यांनी त्याच्याकडे वादभिक्षा मागितली. मंडनमिश्र तयार झाला पण वादाचा निर्णय कोण घेईल असे मंडनमिश्राने विचारले. शंकराचार्य म्हणाले, "तुमची पत्नी सरस्वती ही शुद्ध मतीची आहे. ती जो निर्णय घेईल तो मला मान्य होईल." सरस्वतीने दोन फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्याच्या गळ्यातील माळ सर्वात प्रथम सुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरात कामास गेली.वादात मंडनमिश्र हरला त्यामुळे त्याला संन्यास घेणे क्रमाने आले पण सरस्वतीने, 'मी त्यांची अर्धांगिनी असल्याने मलाही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही .' असे शंकराचार्यांना सांगितले. शंकराचार्यांनी ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र, दाम्पत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले. तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे सहा महिन्यांची मुदत मागितली. तिने ती मान्य केली.
अमरू नावाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता. त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश केला व आपल्या शिष्यांना घनदाट अरण्यात एका दुर्गम गुहेत आपले शरीर रक्षण करून ठेवून त्यावर पहारा करण्यास सांगितले. तिकडे अचानक अमरुराजा उठला. ते पाहून नगरात आनंदोत्सव झाला. अमरुराजाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी गृहस्थाश्रमाचा जो अनुभव घेतला तो 'अमरुशतकम' नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला. थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठ ज्ञानयोगी राजाच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशय आला .त्यामुळे तिने गुप्तपणे आपल्या देशातील सर्व ठिकाणी शोध करून कोठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असा आदेश दिला. हेरांनी शंकराचार्यांच्या मृत शरीराचे रक्षण करणारे चार साधू हेरले. तेव्हा त्वरेने एक शिष्य राजवाड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेली खूण म्हणून भगवी छाटी दाखविली. तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्म तत्व काढून गतीने ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले.शंकराच्या एका हाताला मात्र अमरुराजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना झळ लागली कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती. करावलंबन नावाचे स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला. नंतर शंकराचार्य मंडनमिश्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी मंडनमिश्राचा व सरस्वतीचा पराभव केला. मंडनमिश्राने संन्यास घेतला. सुरेश्वराचार्य या नावाने तो शंकरशिष्य प्रख्यात झाला.
शंकराचार्यांनी आपल्या बुद्धी वैभवाने भारतभर अनेक माताभिमानी पंडितांशी वाद केला हिंदुधर्माचा, वेद-उपनिषदांचा उपासना व ज्ञान मार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला. विष्णुसहस्त्रनाम व भगवतगीता यावर त्यांनी अनेक भाष्ये केली व अनेक ग्रंथ लिहिले. आपल्या मातेचा मृत्यू जवळ आला आहे हे जाणून शंकराचार्य तिला भेटावयास गेले. ती वैकुंठास गेली. नंतर शंकराचार्य शृंगेरी येथे जाऊन राहिले.
शंकराची लीला अगाध आहे. तो भक्तवत्सल आहे. तो भक्तांना निजपदी नेतो. त्याला शरण जाऊन जे भक्त ओम नमः शिवाय वा नमः शिवाय मंत्राचा जप करतात त्यांना शंकर आत्मरूप करतो.
साम्बसदाशिवार्पणमस्तु
फलश्रुती: या ग्रंथाच्या पठणाने धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल,वेदांत ज्ञान सुलभ होईल.
No comments:
Post a Comment