श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दुसरा
महाशिवरात्री महात्म्य.
ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही. शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते. त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात. शिवप्रसादाने मुक्तीही मिळते.व्यास महर्षीनी माघमासाचे विशेष महत्व सांगितले आहे.याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात.
व्याधाची कथा
सूत म्हणाले, "एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले.योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती.शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला.सर्व सोहळा डोळे भरून पाहिला त्याला त्या लोकांची गंमत वाटली. त्यांची चेष्टा करण्यासाठी शिव शिव म्हणत घोर अरण्यात प्रवेश करण्यासाठी शिवालयाला वळसा घालून तो गेला. जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला.त्या क्षणी त्याची पापे जळून गेली.फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला .शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला.बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना त्यामुळे कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला.त्या झाडाखाली ब्रम्हदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते.त्यावर बिल्वपत्र पडत असल्याने शंकर प्रसन्न झाला.अशाप्रकारे नकळत शिवस्मरण,उपोषण,जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली.एक प्रहर लोटल्यावर एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. ती गर्भिणी असून तिची अंगकांती तेजस्वी होती.व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्य वाणीने बोलू लागली.तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसुतीसमय जवळ आल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले.
ती मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला याचे नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला, "तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग." हरिणीने आपली पूर्वकथा पुढीलप्रमाणे सांगितली. ही हरीणी म्हणजेच रंभा अप्सरा होय.ती सौंदर्यवती होती.तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरण्य नावाच्या असूराबरोबर राहू लागली.देवसंग तिला आवडेनासा झाला.तिने शिवपूजन पण सोडले. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली.तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असूर हिरण्य यांच्या सहित तिला हरिणी होऊन भूलोकी राहण्याचा शाप दिला.शापवचन ऐकून व्यथित झालेल्या रंभेंने क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला उःशाप दिला,"तुम्ही बारा वर्षे हा शाप भोगाल. त्यानंतर माझ्या पदाला याल." आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली.पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा तिने त्यास वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली.पापे काय असतात याचे विवेचन केले.व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले.
व्याध सावजाची वाट पाहत होता. तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली.व्याधाने तिच्यावर नेम धरला. ते पाहून जीवदान द्यावे म्हणून त्याची करूणा भाकू लागली. ती म्हणाली, "या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन.तेव्हा मला मार." व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असशील तर मी तुला जाऊ देईन. हरिणीने ते मान्य केले. तिने नेहमीच्या जीवनात लोक अनेक प्रकारची पापे करतात त्यांचे विवेचन करून वचन दिले कि जर मी माझे वचन पाळले नाही तर मी सांगितलेली सर्व पातके मला लागतील. हरिणीविषयी साशंक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले.
ती हरिणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून बिल्वपत्रे खुडून खाली टाकत होता. तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. व्याधाने धनुष्यावर बाण लावून नेम लावला तेव्हा तो मृग दिनवदन होऊन मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, "हे व्याधा तू आता मला मारू नको. माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो." शिव शापाने मृग बनलेल्या हिरण्यासूराने बऱ्याच पापकर्मांचे निरुपण व्याधाला सांगितले आणि परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले.आश्चर्यचकीत झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली.
रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली लागली त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली " हे व्याधा तू मला मारू नकोस. वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करवून मी तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करेन." व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले. तिने व्याधाला धर्म,अर्थ पाप याची माहिती सांगितली आणि परत येण्याविषयी वचन दिले. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले.
पुढे काही वेळाने मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले. मृग म्हणाला, "तू सर्वात आधी माझे प्राण घे." हरिणी म्हणाल्या, "तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल." पाडसेही नीट विचार करून म्हणाली, "माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार." त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले त्यांनी सर्व हरणांना वंदन केले.त्या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली. तोच एक चमत्कार झाला.आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात पाच मुखे, दहा भुजा असलेले व्याघ्रचर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते.तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला.व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली.व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला.
मृगपरिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला.आज ही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात.
असा हा शिवरात्री महिमा.जिच्या स्मरणाने देखिल महापातके भस्म होतात.
।।सांबसदाशिवार्पणमस्तु।।
फलश्रुती:या अध्यायाच्या पठणाने निरनिराळ्या पूर्वपापांचा निरास होईल.
No comments:
Post a Comment