श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पाचवा
धर्मगुप्त आख्यान
श्री गणेशाय नमः।। जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात.प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही. प्रदोषव्रताचे महात्म्य खुप आहे.
सत्यरथ राजाची कथा.
सत्यरथ राजा हा विदर्भनगरीचा अतिशय शूर,तेजस्वी व लोकप्रिय राजा होता.तो परम शिवभक्त होता.पण त्याचे वाढते यश, ऐश्वर्य सहन न होऊन शाल्य देशाच्या राजाने अन्य राज्यांशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले .राजाला त्या युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला.त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली.अरण्यातून जात असता तिला प्रसुतीवेदना सुरू झाल्या.ती व्याकूळ होऊन होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागली.ती प्रसुत होउन तिला पुत्ररत्न झाले.तिने बाळाला झाडाखाली ठेवले. तहान सहन न होऊन राणी कशीबशी रडत रखडत एका सरोवराजवळ आली . तिने ओंजळीत पाणी घेताच दुर्दैवाने एका मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले.
धर्मगुप्ताची कथा.
सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला.त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री तिथून जात होती .तो रडण्याचा आवाज ऐकून ती तिथे आली. ज्याची नाळही कापलेली नाही असा देखणा गोरागोमटा नवजात मुलगा रडत असलेला पाहून तिचे काळीज गलबलले. मातृसुलभ वात्सल्याने तिचे हृदय भरून आले पण बाळाला नेण्याबद्दल तिचा निश्चय होईना.तेव्हा शंभोनी साधूचे रुप घेऊन येऊन तिला सांगितले," हे ब्राह्मणी हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुला सापडला आहे पण या गोष्टीची कोठेही वाच्यता न करता तुझ्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ कर." त्यानंतर भगवान अंतर्धान पावले. उमेचा स्वतःचा मुलगा शुचिव्रत व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली.तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले.उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्त राजपुत्र असल्याचे ओळखले.उमेने धर्मगुप्ताची माहिती सांगण्याविषयी त्यांना विनंती केली. शांडिल्य म्हणाले,"हे ब्राह्मणी हा मुलगा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा पुत्र आहे. हा सत्यरथ पूर्वजन्मीही राजा होता.त्या जन्मात प्रदोषकाळी शिवपूजन अर्धवट ठेवून उठल्यामुळे या जन्मात सत्यरथ अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. याच्या मातेने पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता. त्याच सवतीने या जन्मी मगरीच्या रूपाने तिचा जीव घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणी अनाथ पोरका झाला म्हणून प्रदोषकाळी एकाग्रचित्ताने शिवपूजन करावे शिवपूजन चालले असतांना ते अर्धवट टाकून केव्हाही उठू नये." शांडिल्याचे बोलणे पूर्ण होताच उमेने विचारले, "ऋषिवर्य माझा मोठा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य काआहे?" ते म्हणाले, "या तुझ्या मुलाने पूर्वजन्मी लोकांकडून दुष्टपणाने दाने उकळली आहेत. स्वतः कधीही दानधर्म केला नाही. शिवपूजन केले नाही म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे."
उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावर घातले.त्यांनी दोघांना अनुग्रहीत करून नमःशिवाय या मंत्राचा उपदेश करुन प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले. ते व्रत मुलांकडून नीट करवून घेण्याची उमेला सूचना केली. ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यावर उमा दोन मुलांसह एकचक्रा नगरीतच राहिली.शुचिव्रत व धर्मगुप्ताने यथासांग चार महिने प्रदोषव्रत केले. पुढे काही दिवसांनी शुचिव्रत नदीकाठी खेळत असता अचानक शेजारची दरड कोसळली. त्या ढिगार्यात शुचिव्रताला द्रव्यांनी भरलेला एक घट सापडला.त्याच्या प्रभावाने त्यांचे दारिद्रय नाहीसे झाले. ते दोन्ही कुमार नित्यनेमाने शिवध्यान व शिवपूजन करीत असत.आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता.एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्वकन्या दिसल्या.धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली.ती कोद्रविण नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती.तो तिच्यावर मोहित झाला.
एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभोंनी पृथ्वीवरील माझ्या परमभक्त धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते.शंभोचे हे वचन असे खरे होऊ पहात होते. धर्मगुप्त गंधर्व कन्यांच्या जवळ गेला. त्याचे रूप पाहून अंशुमती त्याच्यावर मोहित झाली. तिने आपल्या सख्यांना दूर पाठविले आणि राजपुत्राला धिटाईने जवळ बोलाविले. त्याच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ घालून, "आता मी काया वाचा मने तुझी पत्नी झाली आहे" असे म्हणून त्याच्या चरणी मस्तक ठेवले.धर्मगुप्ताने अंशुमतीला स्वतः ची ओळख सांगून तिचे वडील हा विवाह प्रस्ताव स्वीकारतील का असा प्रश्न उपस्थित केला .तेव्हा तिने आपल्या पित्याची संमती घेऊन तीन दिवसांनंतर त्याच वनात ती आपल्या पित्यासह येणार असल्याचे सांगितले. अंशूमतीने गंधर्व लोकी आपल्या पित्याला आपले मनोगत सांगताच कोद्रविण गंधर्वाला आनंद झाला. घरी गेल्यावर वनातील सर्व वृत्तांत धर्मगुप्ताने आपल्या आईला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, "तुम्ही भक्तिभावाने प्रदोषव्रत केलेत त्याचेच हे पुण्यफळ आहे."तीन दिवसांनी कोद्रविण गंधर्वराजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करुन दिला. विवाहसोहळ्यात गंधर्व राजाने उमेला स्वर्गातील दिव्य अमूल्य अशा नानाविध भेटवस्तू दिल्या. जामात धर्मगुप्ताला भरपूर वैभव दिले.पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने गंधर्वराजाच्या चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून आपले राज्य परत मिळविले. त्याने आपली पत्नी,माता,बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. शुचिव्रताला युवराजपद दिले. शांडिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत, दिव्य रत्ने, आभूषणे, वस्त्रे दिली.त्याने सर्व प्रजाजन सुखी केले. पुढे कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्तला राज्याभिषेक केला व तो तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. तेथे शंकराचे अहोरात्र ध्यान करू लागला. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या शिवाने विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले आणि त्यांच्यावर कृपा केली. त्यांची अक्षय पदी स्थापना केली.
सूत म्हणाले ,हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तिने पठण व श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल.
प्रदोष महिमा अदभूत आहे जो कोणी विधिपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्रय, अपमृत्यु चे भय राहणार नाही.
।।श्रीसांबसदाशीवार्पणमस्तु।।
फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने व प्रदोषव्रत केल्याने सहा महिन्यात गतवैभव परत मिळेल. हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल.
No comments:
Post a Comment