Friday, March 25, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                         

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा 

                            कवीचे निवेदन, शंकराचार्य आख्यान, ग्रंथाची फलश्रुती .


 कवीचे शिवलीलामृतातील चौदा अध्याय लिहूनही समाधान झाले नाही म्हणून त्याने शंकराला अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली. शिवाने कृपा करून स्फूर्ती दिली. त्याच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाला, "कलीयुगात पाखंडांच्या मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्यरूपे अवतार घेतला. ते चरित्र प्राकृत भाषेत वर्णन कर." 
कालडी ग्रामात विद्याधिराज नावाचा एक शुचिर्भूत विप्र राहत असे. शिवगुरू नावाचा त्याचा पुत्र होता व आर्याम्बा ही त्याची पत्नी. या दाम्पत्याने लोकोत्तर पुत्र व्हावा म्हणून शंकराची तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला पुत्र व्हावा असे दाम्पत्याने मागितले. शंकराने, 'तुम्हाला कसा पुत्र हवा?ज्ञानी व अल्पायुषी कि अल्पमती व शतायुषी ?' असे  विचारले. त्यावर त्या दाम्पत्याने अल्पायुषी व ज्ञानी पुत्र मागितला. शंकराने तथास्तु म्हटले. अंशावतार म्हणून शिवगुरू व आर्याम्बा यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आला. शंकराच्या बालपणीच शिवगुरू मरण पावला. आर्याम्बाला अतिशय दुःख झाले. पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला. शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता. एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला.त्याला वाचविण्यासाठी आर्याम्बाने आरडाओरड केली. तेव्हा शंकर म्हणाला, 'आई, मगर म्हणते. संन्यास घेईन म्हण. नाहीतर मी तुला सोडणार नाही." तेव्हा आर्याम्बाने ते कबूल केले. तात्काळ मगरीने त्याला सोडले. धावत काठावर येऊन तो आईच्या पाया पडला. तेव्हा, ' माझ्या अंत:काळी तरी मला येऊन भेट.' असे तिने मुलाला सांगितले. शंकराने तिला तसे वचन दिले. 

ओंकार मांधाता या क्षेत्रात येऊन शंकराने संन्यास घेतला. गोविंद यती हे त्याचे गुरु व गौडपादाचार्य हे परमगुरु. बद्रिकाश्रमात त्याने शास्त्राभ्यास व वाराणसी येथे त्याने भाष्यरचना केली. नंतर तो वाद करून सर्व  मतांपेक्षा अद्वैत मत श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी दिग्विजय करण्यास निघाला. त्याने भारतभर अनेक पंडितांना वादात जिंकले आणि आपले शिष्य केले. एकदा भिक्षेची सोय म्हणून त्याचे शिष्य झालेल्या शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने एका कासाराच्या दुकानापुढे भिक्षा मागितली. कासाराने  शंकराच्या हातात काचेचा रस दिला.शंकराने तो उष्ण रस पिऊन  टाकला. ते पाहून चार शिष्यांना सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले. मोक्षदायक ज्ञानमार्ग जगात रूढ करण्यासाठी शंकराचाऱ्यांनी अनेक पंडितांशी वाद करून अद्वैतमत प्रस्थापित केले. उत्तर देशात महिष्मती नगरात मंडनमिश्र नावाचा एक कर्मठ पंडित राहत होता. शंकराचार्यांनी त्याच्याकडे वादभिक्षा मागितली. मंडनमिश्र तयार झाला पण वादाचा निर्णय कोण घेईल असे मंडनमिश्राने विचारले. शंकराचार्य म्हणाले, "तुमची पत्नी सरस्वती ही शुद्ध मतीची आहे. ती जो निर्णय घेईल तो मला मान्य होईल."  सरस्वतीने दोन फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्याच्या गळ्यातील माळ सर्वात प्रथम सुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरात कामास गेली.वादात मंडनमिश्र हरला त्यामुळे त्याला संन्यास घेणे  क्रमाने आले पण सरस्वतीने, 'मी त्यांची अर्धांगिनी असल्याने मलाही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही .' असे शंकराचार्यांना सांगितले. शंकराचार्यांनी ते मान्य करताच वादात सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र, दाम्पत्य जीवनाविषयी  गुप्त प्रश्न विचारले. तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे सहा महिन्यांची मुदत मागितली. तिने ती मान्य केली. 

अमरू नावाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता. त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश केला व आपल्या शिष्यांना घनदाट अरण्यात एका दुर्गम गुहेत आपले शरीर रक्षण करून ठेवून त्यावर पहारा करण्यास सांगितले. तिकडे अचानक अमरुराजा  उठला. ते पाहून नगरात आनंदोत्सव झाला. अमरुराजाच्या शरीरात राहून शंकराचार्यांनी गृहस्थाश्रमाचा जो अनुभव घेतला तो 'अमरुशतकम'  नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला. थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठ ज्ञानयोगी राजाच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशय आला .त्यामुळे तिने गुप्तपणे आपल्या देशातील सर्व ठिकाणी शोध करून कोठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाका असा आदेश दिला. हेरांनी शंकराचार्यांच्या मृत शरीराचे रक्षण करणारे चार साधू हेरले. तेव्हा त्वरेने एक शिष्य राजवाड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेली खूण म्हणून भगवी छाटी दाखविली. तेव्हा त्या देहातून शंकराचार्यांनी आपले सूक्ष्म तत्व काढून गतीने ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले.शंकराच्या एका हाताला मात्र अमरुराजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना झळ लागली कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती. करावलंबन नावाचे स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपला हात बरा केला. नंतर शंकराचार्य मंडनमिश्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी मंडनमिश्राचा व सरस्वतीचा पराभव केला. मंडनमिश्राने संन्यास घेतला. सुरेश्वराचार्य या नावाने तो शंकरशिष्य प्रख्यात झाला. 

शंकराचार्यांनी आपल्या बुद्धी वैभवाने भारतभर अनेक माताभिमानी पंडितांशी वाद केला हिंदुधर्माचा, वेद-उपनिषदांचा उपासना व ज्ञान मार्गाचा प्रभाव पुन्हा स्थापित केला. विष्णुसहस्त्रनाम व भगवतगीता यावर त्यांनी अनेक भाष्ये केली व अनेक ग्रंथ लिहिले. आपल्या मातेचा मृत्यू जवळ आला आहे हे जाणून शंकराचार्य तिला भेटावयास गेले. ती  वैकुंठास गेली. नंतर शंकराचार्य शृंगेरी येथे जाऊन राहिले. 

शंकराची लीला अगाध आहे. तो भक्तवत्सल आहे. तो भक्तांना निजपदी नेतो.  त्याला शरण जाऊन जे भक्त ओम नमः शिवाय वा नमः शिवाय मंत्राचा जप करतात त्यांना शंकर आत्मरूप करतो.

                                                         साम्बसदाशिवार्पणमस्तु 

फलश्रुती: या ग्रंथाच्या पठणाने धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल,वेदांत ज्ञान सुलभ होईल.

Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा

 

                                   

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा 

                       पार्वतीचा भिल्लीण वेश व श्रियाळ चांगुणेची सत्वपरीक्षा.

श्री गणेशाय नमः।।

सूत मुनी म्हणाले," गजानन व षडानन  लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवित असे. गजानन तिच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोंड  मोठ्या  प्रेमाने आईच्या पाठीवरून  फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला,' हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? ' हे ऐकून षडानन रागावून म्हणाला .' तुझे उष्टे मी कशाला घेऊ?'  षडानन वैतागून म्हणाला, 'आई, तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र? त्याचा एक दात बाहेर आहे. त्याचे कान फताडे.' ते ऐकून शंकर-पार्वती मनमुराद हसले.षडाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले, पार्वती त्याला दुग्धपान करत असता. त्याची अन्य पाच तोंडे  भूक भूक  म्हणून रडू लागली. तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला,' आई तु याच्या पाच मूखाना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार?'  त्यावर अपर्णा म्हणाली, ' तो आपल्या पित्यावर गेला आहे, त्यांना पाच मुखे आहेत. त्याला त्यांच्यापेक्षा एक मूख जास्त आहे एवढेच!' पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. गजानन व षडानन यांचे एकमेकांवर खुप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे. गप्पा मारायचे. एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात मोठी मौज यायची. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसले असता पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहून त्याला विचारले, ' तुमच्या जटांमध्ये कोणत्या स्त्रीची आकृती दिसत आहे? ' त्यावर शंकराने तिला सांगितले ,' माझ्या जटांमध्ये मी जल धारण केले आहे.' आपल्या जटामधील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत  नव्हता.पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख प्रत्युत्तर देत होता. त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली,' तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते. तुमच्यापुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम.' एके दिवशी शिव पार्वती सारीपाट खेळत असता तेथे नारदांचे आगमन झाले.शिव पार्वतीला  वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले .' नुसते खेळून काय उपयोग? काहीतरी पण लावला तर खेळायला गंमत येईल.' असे नारद म्हणाले. नारदाचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. सातत्याने भवानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. शेवटी एक कौपिन  उरला होता. पण डाव जिंकून तिने तो ही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशाप्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसला. दिगंबर झाला. त्यावर नारद शंकराला म्हणाले, ' देवा हे काय एका स्त्रीने तुला हरवले. तुझा महिमा बुडाला. आता तू स्वतः मायेच्या आधीन झाला आहे ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? ' नारदांचे बोल शंकराच्या जिव्हारी लागून तो रुसून घोर अरण्यात निघून गेला. शंकर निघून गेल्यावर पार्वतीला करमनासे झाले. तिने आपल्या सख्यांसह त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण तो तिला सापडलाच नाही. अशाप्रकारे जो साधनांना आणि वेदशास्त्रास अगम्य आहे त्या शंकराला हाका मारीत जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली.शेवटी  थकून भागून सर्व अभिमान टाकून जागच्या जागी ती शंकराला शरण  गेली आणि काम झाले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयात एका गुप्त  स्थानी समाधीत निमग्न होता.

 पार्वतीने भिल्लिणीचे रूप घेतले. ती मोरपिसांची वस्त्रे नेसली.भिल्लिणीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती. अनंत ब्रम्हांडाचा माळा गळ्यात  मिरवणारी त्रिभुवनसुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली. ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या.  तिने आपल्या पदलालित्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली होती. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिणीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला. आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला, 'हे लावण्यवती! तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या  सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे. मी तुझ्या आधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर.' त्यावर भिल्लीण  मिळाली, 'तुमची पत्नी पार्वती! तिच्या सौंदर्याला उपमा नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी!' त्यावर शंकर मिळाला, 'मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही.' भिल्लीण म्हणाली,' माझा पती अतिशय कोपिष्ट असून त्याला जर एवढे जरी कळले कि मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकील.' शंकर म्हणाला,' पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहित आहे काय? गेल्या जन्मी संतापाच्या भारत तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत.' त्यावर भिल्लीण म्हणाली,'पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात. तुम्ही गंगेला जटामध्ये लपवून तिला उच्च पद दिले. तुमची ही लबाडी लक्षात घेऊनही भवानी बिचारी गप्प बसली. आता तुम्ही तपश्चर्येच्या निमित्ताने वनात आले आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीचा गळ्यात पडू पाहत आहात हे तर तुमचे उघड कपाट आहे.' शंकर म्हणाला,' अगं अशी कठोर नको बोलू. तुला पार्वतीचे उद्योग माहित नाही. म्हणून तू तिची बाजू घेत आहेस. आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या  केल्या तरी मी कैलासात परत जाणार नाही. मी तिच्याशी बोलणारही नाही. तू नेशील तिकडे येईन.' भिल्लीण म्हणाली,' भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता? तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय  पाड! ' बोलणे संपवून नृत्यगायन करीत ती भराभर दूर जाऊ लागली. शंकर तिच्यामागे धावला. तेव्हा 'ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या मी तुमची कामिनी होईन.' असे ती शंकराला म्हणाली . ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला त्याला कैलासावर नेऊन तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याला वंदन करून कंठात वरमाला घालून ती मूळ स्वरूपात प्रकट झाली.त्यांचे भांडण मिटले. अंबेने शंकराचे सर्व वैभव परत दिले. ' तू धन्य आहे. तू मला परत आणलेस त्यातच तुझे प्रेम दिसून येते. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे.' असे म्हणून शंकराने पार्वतीचे कौतुक केले.

श्रियाळ आणि चांगुणेची सत्वपरीक्षा.

सूत म्हणाले, ' एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले. नारद म्हणाले, ' विश्वनाथा कांती नगरात राहणाऱ्या श्रियाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे. तो विचारशील, उदार, सुशील, सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे.अतिथीला  इच्छाभोजन देऊन तो सन्मान करतो.' ते ऐकून शंकराला श्रियाळाबद्दल कौतुक वाटून त्यांनी त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे  रूप घेतले व तो श्रियाळाच्या दारी आला.श्रियाळ व त्याची पत्नी चांगुणा यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्याची आसनावर बसवून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्याला त्याची इच्छा विचारली. तेव्हा अतिथीने मला नरमांस खाण्याची इच्छा आहे. पण एखादा चोर किंवा विकत घेतलेला मनुष्य याचे नरमांस मला अजिबात चालणार नाही. तेव्हा श्रियाळ व चांगुणेने त्याला स्वतःचे नरमांस देण्याची तयारी दाखविली.तेव्हा, 'तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालविल?'असे अतिथीने विचारले. त्यावर त्यांनी अतिथीला, 'आम्ही काय करावे?' असे विचारले. तेव्हा अतिथीने, ' मला तुझ्या पाच वर्षाच्या मुलाचे  मांस खाण्यासाठी दे .' असे सांगितले. त्यावर मोह, ममता  दूर सारून ते दोघे या गोष्टीस तयार झाले व त्याने अतिथीस चिलयास घेऊन जाण्याविषयी विनंती केली. त्यावर अतिथी रागावून म्हणाला,' मला तुम्ही त्यांचे मांस  स्वतः शिजवून खाऊ घाला. पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्र वियोगाने व्यथित होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जाईन.' चांगुणेने ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला. तेव्हा चिलया या गोष्टीस तयार झाला. तो म्हणाला, ' सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसाच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल.' ते ऐकून चांगुणेला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले. तिने सर्व मोहमाया दूर सारून मन कठोर करून त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले. व त्याच्या देहांचे मांस शिजवून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते. अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने  तो रागाने निघून जाण्यासाठी उठला. ते पाहून श्रियाळ आणि चांगुणा यांनी त्याचे पाय धरले. तेव्हा अतिथी परत येऊन म्हणाला,' तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले? ते शिजवून का वाढले नाही?' त्यावर चांगुणा मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली.  अतिथी म्हणाला,' ते उखळात घालून माझ्या देखत कांड. रडशील तर याद राख.' चांगुणेने तेही मान्य केले. शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते कांडत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तुझ्या मुखावर मला जराही खंत दिसता कामा नये असेही बजावले. सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुणेने तेही मान्य केले. पुत्राचे  मस्तक कांडताना चिलयाचे गुणवर्णन करणारे गाणे ती गात होती. मस्तक कांडून झाल्यावर तिने तेही शिजवले व ताट मांडून आतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली. त्यावर अतिथीने श्रियाळास पंक्तीत बसण्यास सांगितले. आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने श्रियाळाचे सर्वांग शहारले. चांगुणेने त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दांनी समजाविले. तिने त्याचे ताट वाढून आणले. त्यावर अतिथीने चांगुणेस भोजनास बसण्यास सांगितले. ती जेवायला बसली इतक्यात अतिथीला  काय वाटले कोणास ठाऊक अचानक अतिथी उठला व निपुत्रिकांच्या घरचे अन्न मी  घेणार नाही असे म्हणू लागला. ते ऐकताच श्रियाळ व चांगुणा यांचा कंठ दाटून आला. 'स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अर्पण केला आता निपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न  नको म्हणता त्याला काय म्हणावं? तुम्ही किती अंत पाहणार आहात?' ती गहिवरून रडू लागली व म्हणाली,' महादेवा माझे सत्व बुडाले. माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला.' तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली  नगरजन चिलयाची आठवण काढून शोक करु लागले. देवांनी आकाशात दाटी केली. प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगुणेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथि म्हणाला,'चांगुणे  तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे.' चांगुणा म्हणाली,' मला निपुत्रिक म्हणून लोक हिणवतील तेव्हा हा कलंक कृपया धुऊन काढा.' अतिथी  म्हणाला,'तू चिलयाला हाक मारून बोलाव तो धावत येईल.' तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुणेने  चिलयाला मोठ्याने हाक मारली. तर काय आश्चर्य! चिलया धावत धावत घरात आला. त्याचक्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाला.  श्रियाळ व  चांगुणा यांनी आपल्या आराध्य महादेवांच्या चरणावर लोळण घेतली. त्याने चिलयाला मांडीवर बसवून त्याच्या मस्तकावर वरदहस्त फिरविला. या मंगल प्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली.श्री शिवकृपेने श्रियाळ व  चांगुणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली.शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले.  श्रियाळ व  चांगुणा यांच्या  पुण्याईने कांतीनगरात  सौख्य नांदू लागले तेथे सर्वांचे कल्याण झाले.'

शिवलीलामृताचा हा चौदावा अध्याय म्हणजे.चौदा विद्यांचे सार आहे.या ग्रंथाचे श्रवण पठण करता आयु,आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते.सर्व दुःखे नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो.शिवमंत्र,रूद्राक्षधारण,रूद्राध्याय, प्रदोष,शिवरात्री,भस्म धारण ,शिवकिर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी.हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यावर शिवशंभों कृपादृष्टी करेल.

इति शिवलीलामृत समाप्त.

                                                 ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने घरात शांती नांदेल. गृहस्थाश्रम सफल होईल. अतिथी प्रसन्न होईल.

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा

                             

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा   

     दक्षयज्ञाचा विध्वंस,त्रिपुरदहन,शिवपार्वती विवाह,स्कंदाचा जन्म,तारकासुराचा वध.

श्रीगणेशाय नमः।।

दक्षयज्ञाचा विध्वंस.

महामुनी सूत म्हणाले त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले होते पण शंकर त्याचा  जामात असूनही त्याने शंकराला बोलावले नाही. तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा. दक्ष शिवनंदा का करीत असे?  एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला. तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला. दक्षाची कन्या दाक्षायणी ही मात्र मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट कैलासावर पाहत होती. पण बोलावले न आल्यामुळे ती उदास झाली. ती शंकराला म्हणाली,' घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे मी स्वतः तिथे जाईन.'  शंकराने तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली. इतक्यात तेथे देवर्षी नारदांचे  आगमन झाले. ते म्हणाले,' तुला तेथे जावेसे वाटते ना मग जा. पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे? ' तेव्हा दाक्षायणी काही भूत गणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेली. दाक्षायणीला पाहून यज्ञमंडपात सर्वांना आनंद झाला पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या. दाक्षायणीच्या आई व भगिनींनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. दक्ष आणि त्याचा परिवार हेतूपुरस्पर दाक्षायणीचा म्हणजे साक्षात आदिमायेचा अपमान करीत आहे हे सर्वांच्या लक्षात आले. आता काय होणाऱ्या कुशंकेने सर्वांना सतावले. तो अपमान सहन न होऊन तिने देहत्यागाचा विचार केला आणि धगधगत्या यज्ञकुंडात सर्वांदेखत उडी घेतली. शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडला प्रकार शंकराला सांगितला. या आत्मदहनाचे दुःखद वृत्त समजताच शंकराला भयंकर संताप आला. त्याने प्रचंड आरोळी  देऊन आवेशाने आपल्या जटा उपटल्या. त्यावेळी तेथे अद्वितीय महापुरुष प्रकटला. तो  प्रलयरुद्र म्हणजे वीरभद्र! शंकराचा क्रोधाग्नी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता. शंकराला वंदन करून तो एकवीस पद्मे दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला. त्याला पाहून यज्ञमंडपात भीतीची छाया पसरली. सर्व देव, ऋत्विज दाहीदिशा पळाले. त्यावेळी त्रैलोक्यात एकच आकांत झाला. चंद्र कोंबडा ,अग्नी मोर, वरूण ससा, सूर्य कपोत  व इंद्र पोपट या रुपाने पळून गेले. नवग्रहही पक्ष्यांच्या रुपाने उडून गेले.  वीरभद्राचे उग्ररूप पाहून अनेकांचे जीव गेले. शंकर यज्ञमंडपात घुसला, त्याने यज्ञमंडप उद्ध्वस्त करून टाकला. थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तलवार उपसून  दक्षाचा  शिरच्छेद केला. दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले  ते वीरभद्राने पायाखाली तुडविले. दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले ब्रह्मदेव व सर्व देवांनी शंकराची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली. पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला तेव्हा वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या  धडाला  लावताच  त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला. बारा वर्षे वने आणि उपवने यांच्यात संचार करून तो काशीत आला. मग तेथे सहस्त्र वर्षे तपश्चर्यामग्न राहिला. 

 दाक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या पार्वती म्हणून जन्म घेतला. अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नव्हती. पार्वती लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे. कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला व तेथील एकांतात तपश्चर्या करू लागला. तारकासुराला तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन असे तीन पुत्र होते .हे तिन्ही बंधू रोज एक हजार कमळे वाहून शंकराची पूजा करीत. एकदा एक फुल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वाहिले. पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमले अर्पण केली. त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शंकराने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले. त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी तीन पुरे त्यांना दिली. शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फारच उन्मत्त झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले. पृथ्वीवर अनंत अत्याचार केले. देव आणि ऋषी यांनी शंकराला तारकासुराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे वृत्त सांगून त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शंकराने त्रिपुरासुराचे मर्दन करण्यासाठी एक दिव्य रथ मागितला. देवांनी पृथ्वीचा दिव्य रथ बनवून शंकराला दिला. त्या दिव्य रथावर शंकर आरूढ होताच तो रसातळाला जाऊ लागला.नंदीने आपल्या शिंगांनी बलपूर्वक तो वर काढला. मग शंकराने एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुरासुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला.असुरांकडे अमृताची कुंडे असल्याने ते अमृत शिंपून त्रिपुरदैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले. अमृत कुंडाचे रहस्य कळताच शंकराने मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली. अशी तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष्य करणे शंकराला शक्य होत नव्हते अशी एक हजार दिव्य वर्षे लोटली. लक्ष्य वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांच्या पापण्या न मिटल्यामुळे त्याच्या डोळ्यातून जलबिंदू पडले. त्यांचे रुद्राक्ष झाले. अंगातून घामाच्या धारा निघाल्या. त्यांची भीमा नदी झाली. त्रिपुरांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने शंकराचा जय होत नाही ही गोष्ट विष्णूच्या  लक्षात येतात त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रीयांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्राचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाठबळ संपले व दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले. शंकराने अत्यंत दैदिप्यमान असा विष्णुबाण  व त्याच्या जोडीला पाशुपतास्त्राची योजना केली. शंकराने न्यासांसहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्य अस्त्र सोडताच नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुरांचा नाश झाला.सर्वांनी शंकराची अपार स्तुती केली.

 तिकडे पुत्रांच्या मृत्युने भयंकर संतापलेल्या तारकासुराने  देव,अप्सरा,देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधिलिखित असल्याने व शंकर वियोगाने विरक्त झाला असल्याने त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवांनी मदनाला पाचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली. मदनाने देवांची विनंती मान्य करून तो रतीसह शंकराजवळ आला. रतीने उमेच्या मनात प्रवेश केला त्याच वेळी संधी साधून  मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकराला कामप्रेरित केले. शंकराच्या समाधीत विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकराने डोळे उघडले. समोर उभा असलेला मदन दिसला. शंकराने हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व प्रकटलेल्या अग्नीज्वाळांनी मदनाला जाळून भस्म केले. ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. मदनाचे दहन झाल्याने रती शोक करू लागली. तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सांत्वन करून तुझा पती द्वापारयुगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल तेव्हा तुमचे पुनर्मीलन होईल असे सांगून तिचे समाधान केले. तिकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेऊन शंकराला उमेला वरण्याविषयी विनंती केली. तेव्हा उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटू रुपाने तिच्यापाशी आला व शंकराचा उपहास करू लागला . ते ऐकून घेऊन ती चवताळून  म्हणाली. 'तू ब्राह्मण आहेस म्हणून नाही तर मी तुला चांगलीच शिक्षा केली असती.' तिचा आवेश पाहून शंकर बटू रूप टाकून निजस्वरूपात प्रकट झाला. तेव्हा शंकराचा जयजयकार करून उमेने त्याचे पाय धरले व 'तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर.' असे वरदान मागितले. शंकराने मान्य करतात ती आनंदाने घरी परतली.सप्तर्षींनी विवाहाची  चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी निश्चित केली. हे वृत्त कळताच देवांचा आनंद गगनात मावेना. शिवपार्वती विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती. शंकराने पार्वतीचे यथाविधी पाणिग्रहण केले.याज्ञीक कृत्ये पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण होमाभोवती  फेरे घालताना उमेची पदनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली. त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला व  संकल्पाने विधात्याचे वीर्यस्खलित होऊन त्यातून साठ हजार वालखिल्य ऋषी निर्माण झाले.ते पाहून  शंकराला क्रोध येऊन त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला. पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले. हा विवाह सोहळा चार दिवस चालला होता. पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला पुढे काही दिवसांनी देवांनी शंकराची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली. शंकराने मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले. त्यामुळे तो मन रूपाने कार्यरत  झाला. सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते पण चार युगे लोटूनही शिवपार्वतीस पुत्र झाला नाही, तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली. देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवपार्वतीचा एकांत भंग करण्याचे धाडस होईना तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास  करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठविले. भिक्षेसाठी हाक मारताच त्याची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकराने, 'आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य दे.' असे पार्वतीला सांगितले. त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले त्या वीर्याचा काही भाग खाली पडला त्याचे  तात्काळ पाऱ्यात रूपांतर झाले. पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केल्याने तो गरोदर झाला. लज्जित होऊन रानावनात एकटाच फिरत असता त्याला एका ठिकाणी सहा कृतिका दिसल्या. अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालताच त्या गर्भवती झाल्या. हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या. तेव्हा एक चमत्कार होऊन ते साही गर्भ एकवटून सहा मुख बारा हात असलेले  दिव्य  बालक प्रकट झाले. कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी! जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमेच्या  स्वाधीन केले व स्कंद असे त्याचे नामाभिधान केले. सर्व देवांना आनंद झाला अत्याचारी तारकासुराला धडा शिकविण्यासाठी सर्व देव एकवटले व त्याच्यावर चाल करून गेले. इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला.

स्कंदाने अतिप्रचंड रूप  धारण करून तारकासुराशी युद्ध केले. युद्धात आपल्या मंत्र शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आव्हान दिले. सात दिवस अद्भूत मल्लयुद्ध झाले अखेर  कुमाराने तारकासुराच्या पायाला धरून गरगर फिरवून त्याला जोराने खाली आपटले. तारकासुर मेला देवांनी कुमाराचा  जय जयकार  करून त्याच्यावर फुले उधळली.चौदा भुवनी  आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्या विषयी आग्रह करू लागली पण आपण येथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला. पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही. दुःखाने भूमीवर अंग टाकून ती रडू लागली. कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो तिला म्हणाला, "जी स्त्री यापुढे  माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिकमासात कृत्तिकायोग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल." पुढे ऋषी स्कंदाची भेट घेऊन म्हणाले ," पार्वती तुझी माता आहे. तुला भेटण्यासाठी ती अहोरात्र तळमळत आहे तिला वाराणशीस जाऊन भेटून ये."  ती विनंती मान्य करून स्कंदाने काशीस शिवपार्वतीस भेटून आनंदित केले. मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गूढ स्थानी परतला.

                                                     ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने शिव व विष्णू याची भक्ती उपजेल. वाईट प्रवृत्तींचे निराकरण होईल.

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा

                                   

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय बारावा  

                                 श्रवणरहस्य,बहूलेचा उध्दार, भस्मासूर वध.


श्रीगणेशाय नमः।।
सूत सांगतात,शिवकिर्तन नित्य ऐकावे.जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात.नित्य शिवस्मरण करावे.

बहुलेचा उध्दार.
श्रवणभक्तीचे महत्त्व विशद करणारी एक कथा सूतांनी  सांगितली, ' दक्षिणेकडे बाष्कल  नावाचे एक गलिच्छ गाव होते. तेथील सर्व लोकं अनाचारी, व्यभिचारी,नीतिमत्तेची जराही चाड नसलेले व धर्म सोडून दिले असे होते. त्या गावात विदुर नावाचा एक कामलोलुप  ब्राह्मण राहत असे.त्याची पत्नी बहुला हीसुद्धा व्याभिचारीणी होती. एके दिवशी ती आपल्या जाराशी एकांतात रममाण झाली असता विदुराने तिला पकडले. जार पळून गेला. विदुराने  बहुलेला पुष्कळ मारले.लाथाबुक्क्यांनी कुदवले. ती संतापून नवऱ्याला म्हणाली, ' तू वेश्येकडे  जातोस मग मी जारकर्म केले म्हणून काय बिघडले.' विदूर म्हणाला , 'या जारकर्मातून  मिळालेले धन तू मला देऊन टाक.' पत्नीने नकार देताच त्याने तिला मारझोड करून तिच्या अंगावरचे सर्व दागिने, घरातले द्रव्य घेतले आणि ती सर्व संपत्ती आपल्या आवडत्या वेश्येला देऊन टाकली. त्या वेश्येने ते द्रव्य अलंकार आपल्या प्रियकराला देऊन टाकले. विदूर आणि बहुला यांचे जीवन पापकर्मे करण्यात व्यतीत झाले. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला कुंभीपाक नरकात घालून अतोनात छळ केला. त्यानंतर त्याला फारच भयंकर पिशाच्चरूप प्राप्त झाले. तो विंध्य पर्वताच्या दऱ्याखोऱ्यात संचार करू लागला. तहान भुकेने व्याकूळ होऊन अरण्यातून फिरायचा. अंगाला आळोखे पिळोखे द्यायचा. झाडाच्या फांदीवर स्वतःला उलटे टांगून घ्यायचा अशाप्रकारे तो विदुर ब्राम्हण आपल्या पाप कर्माची फळे भोगत होता. बहुला विधवेचे आयुष्य कंठू लागली. तिला एक मुलगा होता पण तो कोणापासून हे तिला माहीत नव्हते. काही दिवसानंतर शिवरात्रीच्या पर्वी  ती यात्रेकरूंसमवेत गोकर्ण क्षेत्रात गेली. तेथे लोकांबरोबर बहुलेनेही स्नान केले. महाबळेश्वराचे दर्शन घेऊन ती पुराण ऐकण्यास बसली. जारकर्म करणार्‍या स्त्रीला नरकात टाकून यमदूत किती भयंकर यातना देतात ते पुराणिक बुवा वर्णन करून सांगत होते. ते ऐकून बहुला घाबरली. आपली पापकर्मे आठवून पश्चातापाने रडू लागली. तिची अवस्था बघून पुराणिकाला दया आली. त्याने सांत्वनपर शब्दांनी तिला धीर दिला.
आपण केलेली सर्व पापकर्मे तिने त्याला रडत-रडत कथन केली व पुढे म्हणाली, ' गुरुजी या  दुष्कृत्यांबद्दल यमदूत  मला अनंत यातना देतील. त्या दु:खाच्या कल्पनेने  माझ्या अंगाचा थरकाप होत आहे. आता मी कोणाच्या आश्रयास जाऊ. कोणाचे पाय धरू?' पुढे ती पुराणिकाला म्हणाली, 'तुम्ही मला गुरुस्थानी आहात. मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा.' तो पुराणिक ज्ञानी असल्याने त्याने बहुलेला 'नमः शिवाय' या मंत्राचा उपदेश केला .तिला शिवमंदिरात शिवलीलामृत कथा सांगितली. तिने अत्यंत आदराने तो ग्रंथ  श्रवण  केला. अन्य ग्रंथही ऐकले. सत्संगतीने ती विरक्त होऊन तिचा मोह गेला. चित्तातील उद्वेग नष्ट झाला. नामस्मरणाच्या प्रभावाने तिची सर्व पापे, दोष जळून गेले. बहुला श्रवण भक्तीने पावन झाली. अहोरात्र शिवकीर्तन करून ती मुक्त झाली. बहुलेला सत्संगती आवडू लागली. गोकर्ण क्षेत्री राहून ती जटा वाढवून वल्कले धारण करून मृगाजीन नेसू लागली. आप्तजन घर परिवार या सर्व गोष्टींचा त्याग करून ती गुरु सेवेत रममाण झाली. या साधनेने तिची त्रिदेहशुद्धी झाली. शंकर तिच्यावर प्रसन्न होऊन त्याने दिव्य विमान पाठवून तिला शिवलोकी नेले. एवढी पापिणी बाहुला पण शिवकृपेने तरून गेली. ते पाहून चौदा  भुवनातील लोक थक्क झाले. शिवासन्मुख गेल्यावर तिने शिवपार्वतीची स्तुती केली.भगवतीने  प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले.तेव्हा तिने आपल्या पतीला अधोगती पासून सोडवून पावन करण्याविषयी विनंती केली. अंबेने दिव्य दृष्टीने पाहतात तिला बहुलेचा पती विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात पिशाच्च होऊन भटकत असलेला दिसला.अंबेने बहुलेला  सांगितले की "तुझा पती विंध्याचलावर पिशाच्च योनीत भयंकर दु:खात आहे. तुंबराबरोबर जाऊन तू त्याला शिवकथा ऐकव म्हणजे त्याची सर्व पापे जळून जातील. मग त्याला येथे घेऊन घेऊन ये.' जगदंबेच्या आज्ञेनुसार बहुला तुंबराबरोबर विंध्य पर्वतावर गेली. तुंबराने बलपूर्वक तिच्या पतीला पकडून एका वृक्षाला बांधले. पिशाच्च झालेल्या विदुरासमोर तुंबर शिवलीलांचे मधुर गायन करू लागला. त्या प्रभावाने विदुराला पूर्व स्मृती येऊन ' तो मला सोडवा! मला सोडवा!' अशी विनंती करू लागला. तुंबराने त्याला मुक्त करताच  त्याने तुंबराचे पाय धरले व आपला उद्धार केला म्हणून बहुलेचीही प्रशंसा केली. तुंबराने त्याला ' नमः शिवाय ' या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्राच्या जपाने तो दिव्य रूप पावला.  

तेवढ्यात एक तेजस्वी विमान तेथे आले. त्यात बसून ते तिघेही शिवलोकी गेले. शिवगणांनी विदुराला सन्मानाने शिवाकडे नेले.विदुराने शंकराला वंदन केले. विदुर आणि बहुला ही उभयता शिवस्वरूपी  एकरूप झाली. 

भस्मासूर वध.
सूत सांगतात,
 सूत  म्हणाले, ' एकदा प्रदोष समयी  शंकर आपल्या अंगाला भस्म लावीत होता. तेव्हा त्याच्या हाताला एक खडा लागला त्याने तो बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवताच त्यातून एक असूर उत्पन्न झाला. शंकराने भस्मासूर असे त्याचे नाव ठेवले. भस्मासुराने शंकराला वंदन करून सेवा देण्याविषयी प्रार्थना केली.  तेव्हा शंकराने त्याला दररोज यावेळी नवीन चिताभस्म आणून देण्याची सेवा दिली. भस्मासुर नेमाने पृथ्वीवर शिवभक्तांच्या चितेचे भस्म शंकराला आणून देऊ लागला. आपले काम चोख करू लागल्यामुळे भस्मासुर शंकराला प्रिय झाला पण शंकराची प्रसन्नता लाभल्यामुळे तो उन्मत्त होऊन त्याच्या मनात आसुरी  विचार येऊ लागले. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे निर्दालन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे व सर्वात प्रभावी असुरराज्य स्थापन करावे असे मनोराज्य तो रचित होता. एकदा तो कपटबुद्धीने   शंकराकडे गेला व म्हणाला, 'स्वामी मला रोज पुष्कळ हिंडावे लागते. तसेच मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. माझ्या नित्यनेमात खंड पडू नये म्हणून मी ज्याच्या  मस्तकावर हात ठेवीन त्याचे  भस्म होईल असा मला वर द्या. त्या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल.' आपल्याबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून भोलेनाथाने त्याला वर देण्याचे ठरविले. पार्वती, षडानन, गजानन, वीरभद्र व नंदी या सर्वांनी शंकराला हा वर देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण शंकराला भस्मासुराविषयी विश्वास असल्यामुळे त्याने भस्मासुराला अपेक्षित वर दिला.

 शंकराच्या प्रसादाने भस्मासुराला विवेक न राहता तो गो,ब्राह्मण, संत, सज्जन ऋषी, यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला. त्याने भयंकर नरसंहार केला. त्याच्या भीतीने सर्व ब्राह्मण व प्रजाजन पर्वतांच्या गुहांच्या आश्रयास जाऊन कुठेही बाहेर फिरकेनासे झाले. महावीर व पराक्रमी योद्धाचे  त्याच्यापुढे काहीही चालेना. भस्मासुर शंकराला चिताभस्म देण्याची सेवा विनम्रपणे करत असल्याने कैलासनाथाला  त्याच्या कारस्थानांचा जराही सुगावा लागला नाही. भस्मासुराचा पृथ्वीवरील उपद्रवामुळे ऋषी व प्रजाजन इंद्राला शरण गेले. इंद्र धास्तावून त्या सर्वांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला व शेवटी ते सर्व जण विष्णूकडे गेले. विष्णु सर्वांना घेऊन शंकराकडे गेला व सर्व हकीकत त्याने  त्याला सांगितली. शंकर हसून म्हणाला, 'भस्मासुराचा मृत्यू जवळ आला आहे. तुम्ही निश्चिंत होऊन स्वस्थानी जा.' तो असे बोलत असतानाच भस्मासुर अकस्मात भस्म घेऊन तेथे प्रकट झाला  व त्याने तुच्छतेने मान उडवून म्हटले, 'आज जे येथे आले आहेत त्या सर्वांचे मी उद्या भस्म करणार आहे.' ते ऐकून शंकर क्रोधाने म्हणाला ,' अरे अधमा, मी  दिलेल्या वराने केवढा नरसंहार केला. माझ्याशी प्रतारणा करताना तुला जराही वैषम्य वाटले नाही.' तेव्हा संतापाने भस्मासूर म्हणाला, ' तुझी सुंदर स्त्री मला दे नाहीतर मी तुझे आताच भस्म करतो.'  लगेचच  भस्मासूर शंकराकडे धावला. ते पाहून शंकरही अरण्याकडे पळत सुटला. भस्मासुर त्याचा पाठलाग करू लागला. शंकराची अवस्था पाहून चिंताग्रस्त पार्वतीने विष्णूचा धावा केला.आपल्या बहिणीची आर्तता जाणून विष्णूने  निरुपम सुंदर असे मोहिनी रूप धारण केले व तो भस्मासुराच्या मार्गात उभा राहिला. शंकराने एका वटवृक्षाचे रूप घेतले. धापा टाकीत आलेल्या भस्मासुराने मोहिनीला पाहताच तिच्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला. त्याच्या मनात तिला प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली. तिला गाठून तो म्हणाला ,' तू माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले आहेस. तू माझी हो. तू मला वरमाला घाल. मी निरंतर तुझे दास्य करेन.' भस्मासुर आपल्या कह्यात आल्याचे मोहिनीने जाणले व तात्काळ ती म्हणाली, ' मी तुला नक्की वरीन. पण तो वटवृक्ष माझे आराध्य दैवत आहे. लग्नाआधी भावी पतीसोबत  तुझ्यासमोर नृत्य व गायन करीन असा मी त्या वटवृक्षाला नवस केला आहे म्हणून तू माझ्या  समवेत त्याच्यापुढे नृत्य गायन कर. माझ्याप्रमाणेच मुद्राभिनय हस्तसंकेत  व पदन्यास कर. त्यात जराही चूक झाली तर ते दैवत कोपेल व सर्व ब्रम्हांड जाळून टाकेल.' भस्मासुर म्हणाला, 'तुझ्या प्राप्तीसाठी तू सांगशील तसे नृत्य मी करेन.'  भस्मासुराला आपल्या मोहपाशात अडकवून मोहिनीने तेथे वटवृक्षापशी आणले व आपल्या दैवताला वंदन करून ती नृत्य गायन करू लागली. ते गायन ऐकून गंधर्व, किन्नर, देव अवाक झाले.मोहिनीचे नृत्य पाहून अष्टनायिकाही तटस्थ झाल्या.
 भस्मासुर तिच्या समवेत नृत्य करीत होता. दोघेही देहभान विसरून नृत्य करीत होते. एका बेसावध क्षणी मोहिनीने  करामत केली. आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला भस्मासुराने तसेच करतात त्याला मिळालेले वरदानच शाप ठरले आणि तो जळून खाक झाला. कार्यसिद्धी होताच मोहिनीचे रूप टाकून विष्णूने चतुर्भुज रूप धारण केले. वटवृक्ष अदृश्य होऊन शंकर प्रकट झाला व हरिहर भेट झाली. देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. शंकराने मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली. शंकराचे वीर्यस्खलित  होऊन जमिनीवर पडले. त्याचे आठ भाग होऊन त्यातून असित , अंगार, चंड,  क्रोध,  उन्मत्त, कपाल,भीषण आणि संहार असे अष्टभैरव उत्पन्न झाले. हे शंकराचे अंशावतार म्हणून प्रख्यात आहेत. भस्मासुराचा वध झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला. हरिहर कैलासावर येताच  अंबिकेने त्यांची प्रसन्न वदनाने पूजा केली. दोघांची नावे एकत्र  गुंफून स्तुती केली व त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला .  

                                             ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने व्यसन,पाप, रोग,दारिद्र्य,दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. 

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा

                                   

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय अकरावा 

                                       रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य. भद्रसेन आख्यान.

श्रीगणेशाय नमः।।
रूद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान.
 महामुनी सूत यानी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले तो म्हणाला,' श्रोतेहो जे लोक अंगाला भस्म लावतात. रुद्राक्ष धारण करतात. त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रैलोक्यात धन्य होत. जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच! रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्या विषयीचा एक इतिहास सांगतो. भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा अतिशय प्रजाहितदक्ष, विवेकसंपन्न, ज्ञानी होता. त्याची पत्नीही सुंदर, धर्मशील पतिव्रता व मृदुभाषीणी होती. त्याचा प्रधान ही त्याच्यासारखाच विद्वान, सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता. भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त असून ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करत असत. अनेक शिवअनुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. ते दोघेही प्रेमळ, वितरागी, सत्संगतीत रममाण होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते. त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या पण ते दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत. सर्वांगाला भस्म लावत असत .शंकराची पूजा पाहणे, नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती. त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटून ते दोघेही चिंतामग्न व्हायचे. अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले. पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासाचे पिता होत.ते त्रिकाल ज्ञानी होते. कुलगुरू पराशर आल्याचे कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला. त्यांची षोडशोपचारे पूजा करून आलेल्या इतर सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले .त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले मग पराशर यांना राजानी आपली चिंता सांगितली. तो म्हणाला, ' गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म व प्रधानजींचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही. ते विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलत नाही. शंकराचे ध्यान, अंगावर भस्म लावणे रुद्राक्षांच्या माळा घालणे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून मला ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही.' राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले .पराशर यांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले व अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, 'राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो ऐक.  

 पूर्वी काश्मीर देशातील नंदिग्राम नावाच्या नगरात  महानंदा नावाची अतिशय श्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न व सौंदर्यवती वेश्या राहात होती. तिच्या घरी तिची आई व भाऊ रहात असत. ती भाग्यवान होती. तिच्या घरी राजे-महाराजे व श्रीमंत लोक येत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे. ती वेश्या असूनही पतिव्रतेसारखी वागायची. एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची. त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष, शिवरात्री आदी व्रते करायची. नेहमी अन्नछत्र चालवायची. याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची. महानंदने आपल्या घरात एक कोंबडा व माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून  तिने त्यांना नाचायला शिकवले होते. तिने आपल्या नृत्य शाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. कुक्कुट व मर्कट त्यांना ती तिथेच बांधून ठेवत असे. त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशाप्रकारे तिच्या संगतीने त्या मुक्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे. एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सदनी आले. तिने हसून त्या सुंदर सौदागाराचे  स्वागत केले. त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदेचे  लक्ष वेधले गेले. ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले. तिने तीन दिवस सौदागाराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला. सौदागराने ते मान्य करून वस्त्रांतून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले आणि ते शिवलिंग महानंदेकडे देऊन त्याने तिला सांगितले, ' हे लिंग मला प्राणप्रिय आहे. जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. तात्काळ अग्नी प्रवेश करीन.'  महानंदेने ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले होते. रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले. महानंदेच्या धैर्याची  कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लीलेने नृत्य शाळेस आग लावली. थोड्याच वेळात अग्नीने नृत्य शाळेला चहुकडून वेढले हे वृत्त कळताच महानंदा धावत नृत्यशाळेकडे धावली. तिने भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते वनात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करून अग्नी शांत झाला. सौदागराने तिला आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली. ऊर  पिटून आक्रोश करू लागली. लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यथित झाला आणि त्याने शुष्क काष्ठे रचून अग्नी प्रदीप्त केला.ओम नमः शिवाय म्हणून अग्नीकुंडात उडी घेतली. महानंदने स्वतःच्या धारणे प्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगमन करण्याचे ठरविले. तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितले. 'हर हर शंकर!' असा नामघोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिताग्नीत  उडी घेतली पण तिला वरचेवर झेलून त्या अग्नीतून कैलासनाथ प्रकट झाला व तिला म्हणाला, "महानंदा तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रुपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू वर माग.  महानंदने माझ्यासह नगराचाही उद्धार कर. असे शंकराकडे मागितले. तेव्हा तथास्तु असे आशिर्वचन बोलून शंकर अंतर्धान पावला. शिवगणांनी महानंदा ,तिची माता, बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले. त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले.  महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले हे राजा महानंदने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला. ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार-प्रसार करून तुमचाही उद्धार करतील.' त्याच वेळी राजा भद्रसेनाच्या मनात पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. 

पराशर म्हणाले, ' राजा मी येथे खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही.'  राजांनी त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले,  ' राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्युयोग आहे.' ते ऐकताच राजा व राणी दुःख सागरात बुडाले. पराशर ऋषींनी  राजाला सावरले व त्याला म्हटले, 'रुद्राध्यायापेक्षा  गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही. याहून मोठे साधन नाही. रुद्राध्यायाच्या नित्य पठणाने सर्व विघ्ने निवारण होतात. त्यांनी रुद्राध्यायाचे   महत्त्व विशद करून भद्रसेनाला म्हटले, "राजा चिंता करू नकोस. आजपासून सात दिवस शंकराला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने कर. म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग्य  टळेल.' राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाचे आचार्य व्हावे अशी पराशर मुनींना विनंती केली. पराशरांच्या देखरेखीखाली रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या एक हजार सच्छिल ब्राह्मणांनी रुद्रावर्तनास प्रारंभ केला. एक हजार घटांत  मंदाकिनीचे पाणी भरून आम्रपल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते.

 सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना माध्यान्हसमयी मृत्यूसमय असल्याने राजपुत्र सुधर्म एकदम मूर्च्छित पडला. त्याची मरणोन्मुख अवस्था पाहून राजा घाबरला. पराशर मुनींनी त्याला धीर देऊन रुद्राने अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिंपडताच राजपुत्र सावध झाला. पराशरानी राजपुत्राला तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला, ' गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला घेण्यासाठी आला होता पण कालपुरुष मला घेऊन जात असता  पंचवदन, दहा भुजांचे सर्वांगी भस्म लावलेले  दिव्य पुरुष तेथे धावत आले. त्यांनी मला त्याच्या तावडीतून सोडविले. पुढे काय झाले ते मला माहित नाही. कारण मला जाग आली.' ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो शंकराचा जयजयकार करू लागला. देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजाने सर्व आमंत्रित ब्राम्हणांना दिव्य वस्त्रालंकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला. सर्व याचकांना संतुष्ट केले त्याच वेळी त्या आनंदोस्तवात देवर्षी नारदांचे आगमन झाले. सर्वांच्या आनंदाला पारावार  उरला नाही. दिव्य आसनावर बसवून भद्रसेनाने त्यांची पूजा केली.

नारद म्हणाले,' राजा येथे येत असता मी एक गोष्ट पाहिली. पाच मुखे व दहा हात असलेली अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान!  ज्यामुळे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला. वीरभद्र मृत्यूला विचारीत होता, 'तू कोणाच्या आज्ञेने सुधर्माला नेत होतास ? तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना ? भद्रसेनाचा पुत्र दीर्घायुषी असून  असून तो सार्वभौम राजा होणार आहे.' हे ऐकून यम विचारात पडला आणि त्यांनी चित्रगुप्ताकडे चौकशी केली तो म्हणाला त्याला बाराव्या वर्षी मृत्यू होता पण रुद्रानुष्ठानाच्या मह्तपुण्याईने कुयोग टळला आहे. यमाने आपल्या अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले.' भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले. त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने  सहस्त्र रुद्रावर्तने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला. पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशर मुनींनी  राजाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले. पुढे  सुधर्मास राज्याभिषेक करून व तारकास  युवराजपद देऊन भद्रसेन प्रधानसोबत तपश्चर्येसाठी वनात निघून गेला. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले.त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन कैलासक्षेत्री राहिले. 

रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्याची शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो त्या रुद्राचे महत्व सांगणाऱ्या अध्यायाचे नित्य पठण केल्यास मनुष्य निर्दोष होतो. शिव चिंतनाने शिवस्वरूप होतो या भद्रसेन आख्यानाचे  जो कोणी वाचन करील त्याला दीर्घायुष्य,उत्तम संतती प्राप्त होईल. त्याला कळिकाळाचे  भय राहणार नाही. त्याला शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल.

                                                     ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: रुद्राध्यायाच्या पाठाइतकेच याचे महत्त्व आहे या अध्यायाच्या पठणाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल.

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा

 


       श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा 

                                                     शारदाख्यान

श्री गणेशाय नमः।।
सूत सांगतात,  आनर्त  देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर सुशील व चतुर होती. देवरथाने पद्मनाथ नावाच्या एका  सुशिक्षित ब्राम्हणाशी तिचा विवाह ती बारा वर्षांची असताना लावून दिला. देवरथाने आग्रह करून काही दिवस मुली व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला असता अंधारातून परत येत असताना एक विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतप्राण झाला. ही वार्ता कळताच शारदा मातापित्यांसह तेथे  धावत धावत आली व ते सर्व शोक करु लागले. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होती.पतिच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. एके दिवशी एक अपूर्व घटना घडली. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते.त्या दिवशी नैधृव नावाचे एक वृद्ध  तपस्वी अंध ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले.शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन करून आदराने नमस्कार केला तेव्हा नैधृवाने तिला आशीर्वाद दिला,' बाळा तुझे सौभाग्य वाढो!  तुला वेदवेत्ता पुत्र होवो!' आशीर्वाद ऐकताच असह्य शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितला. नैधृवानी तिला आपल्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही असे सांगितले. माता पिता बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शारदेला धीर देऊन सांगितले की वरकरणी ही गोष्ट जरी अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींच्या प्रभावाने  अशक्य गोष्टीही शक्य होतात. ऋषींनी शारदेला उमामहेशव्रताची माहिती सांगितली आणि 'ओम नमः शिवाय' या षडाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले. तसेच तिला दिलेले व्रत सफल होईपर्यंत ते तिथेच देवरथाच्या  घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले.नैधृवांच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. उमामहेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले.कीर्तन ऐकले. जागरण केले अशाप्रकारे गुरु वचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून ती  यथविधि व्रताचरण करू लागली. शारदा शंकर व पार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप मन:चक्षुसमोर आणून ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नैधृवानी तिच्या कडून यथाविधी उद्यापन करून घेतले.त्यावेळी तिने अकराशे दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन वस्त्रालंकार व  द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व किर्तन केले मध्यरात्रीच्या समयास शारदा नैधृवांच्या जवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करीत असता साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली. मातेच्या कृपाप्रसादाने  नैधृवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नैधृव आणि शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. तिने शारदेला वरदान मागण्यास सांगितले. ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगून मी दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषीच्या मनात असलेला सदभाव जाणून भगवती म्हणाली, ' मुनीवर पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राम्हणाची भामिनी नामक कन्या होती. तिच्या नवऱ्याला दोन स्त्रिया होत्या.हि सुस्वरूप व मृदू भाषणी असल्याने हिने युक्ती प्रयुक्तीने नवर्‍याला आपल्या अधीन करून ठेवले होते. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहात असे.भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने आज कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने त्याला झिडकारून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण तिच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती तिचाच ध्यास घेऊन मरण पावला. तिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने तिला तू विधवा होशील असा शाप दिला. हिने दिलेल्या दुःखामुळे ती मरण पावली. कालांतराने हिलाही मरण आले. भामिनी शारदा म्हणून जन्मली जार पद्मनाभ म्हणून जन्मला. त्याचे हिच्याशी लग्न लागले. पूर्वजन्मी परस्त्री वर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सवतीने दिलेला शाप खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती  होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म लाभला असून तो तीनशे साठ योजने दूर द्रविड देशात आहे. त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो भामिनीचे स्वरूप आठवून तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईल  आणि त्यामुळे तिला गर्भधारणा होऊन एका पुत्रास जन्म देईल. तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राम्हणाला सुख लाभेल.' असे सांगून भवानी अंतर्धान पावली. भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले.

 शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ! लोकांना तिच्या कथांवर विश्वास न बसून ते तिला दूषणे देऊ लागले. तोच आकाशवाणी झाली, ' शारदेला दोष देऊ नका ती म्हणते तेच सत्य आहे.' पण संतापलेल्या लोकांनाही ती आकाशवाणीही कपटाचा खेळ वाटत होती.  त्यात एक पुण्यवान व विवेकी वृद्ध मनुष्य होता.तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजावू लागला. ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य कसे अगाध आहे आणि जगन्नाथ काय करू शकत नाही  अशा अर्थाची उदाहरणे देऊन तो लोकांना समजावू लागला. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते. ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली,'आता जो शारदेची निंदा करील तिला पापी व्यभिचारीणी  म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील.' पण दुर्जनांनी ऐकले नाही. त्यांनी शारदेची निंदा करताच त्यांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही शारदेला वंदन करुन त्यांनी तिची माफी मागितली. लोकनिंदा थांबली.नवमास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले.त्याने चार वेद सहा पुराणांचा सखोल अभ्यास केला. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तो ही परम शिवभक्त असून त्यांनी आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीच्या पर्वणी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली होती. द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता तो शारदेला तिथे भेटला. एकमेकाला पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले.शारदेला देवीने सांगितलेले वचन आठवले. देवी म्हणाली होती, 'मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल तेव्हा उमा महेश व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला देऊन हा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात चार महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर. समागम करू नकोस म्हणजे तू शिवलोकी जाशील.' त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही द्रविड देशात गेली तिचा पुत्र शारदानंदन मातापित्यांची शिवपार्वती समजूनच सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृ-पितृ भक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य! शिव आणि भवानी यांच्या  कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले होते. शारदेचा पती महातपस्वी आणि योगी होता.काही वर्षांनी तो निधन पावला. त्या वेळी  शारदेनेही सहगमन केले त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले.

                                                      ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती:  या अध्यायाच्या पठणाने विवाहित निपुत्रिक दांपत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दांपत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा. 

   

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा

 


     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा   

                               ब्रह्मराक्षस,ब्राह्मण आणि शबर दांपत्याचा उद्धार.

श्रीगणेशाय नमः।।
जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण, संसारभय याचे अस्तित्व नसते.याची कथा सुत सांगतात.

वामदेव व ब्रह्मराक्षस.
सूत म्हणतात,
वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता.तो अरण्यात वास करायचा. सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा. इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौनव्रत धारण करुन असायचा. निराहार राहून तो सर्वत्र निर्हेतुक हिंडायचा.एके दिवशी अरण्यातून भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला. त्या ब्रम्हराक्षसाचे  कपाळ शेंदुरनी माखलेले असून त्याच्या मुखातून भलीमोठी जीभ बाहेर लोंबत होती. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो तहान भुकेने व्याकूळ झाला होता. त्याने वामदेवाला जोरात आवळले. पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असूरवृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उध्दार झाला हे वामदेवा कळले पण नाही.पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने त्याची मती पालटली. वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागतात हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्त्विक वृत्तीचा झाला पण आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका राक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान  नव्हते. वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली. त्या तपस्व्याच्या स्पर्शाने त्या राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले. तो  वामदेवाला वंदन करून म्हणाला, "गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे.तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो. तथापि तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहेत त्यात माझ्याकडून जी महाभयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो. स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो. माझ्या छळ आणि स्वैराचाराला कंटाळून ब्राम्हणांनी आणि प्रजाजनांनीही पलायन केले. शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला.माझ्या मृत्युनंतर मला यमलोकी माझ्या दूराचारांची शिक्षा म्हणून भयंकर नरक यातना दिल्या. गुरुदेव माझ्या प्रत्येक दुष्कृत्याची मला इतकी भयंकर शिक्षा देत होते कि ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या यातना देहाला मरणही येत नव्हते. एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन न झाल्यामुळे मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले. तेथे माझे हाल हाल केले अशा प्रकारे तीन हजार वर्षे भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही. मग मी व्याघ्रयोनीत जन्माला आलो. वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगूस, कावळा, कासव, उंदीर असे पशुपक्षांच्या योनीत तेवीस जन्म घेतले. नंतर दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मला मिळाला आहे, स्वामी आज तुमच्या दर्शन व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे सहस्त्र जन्म आठवताहेत ही केवढी कृपा. संतांचे महात्म्य किती थोर आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली."   ते ऐकून वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हराक्षसाला भस्माचे  महत्त्व विशद करणारी एक कथा सांगितली. तो म्हणाला, "एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्याभिचारी होता. त्याचे एका क्षुद्र स्त्रीशी संबंध होते. हि गोष्ट तिच्या नवर्‍याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राम्हणाचा वध केला आणि प्रेत गावाबाहेर टाकून दिले.  ब्राह्मणाच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यमदूतांनी  त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली.त्या प्रांगणात चिताभस्म विखुरले   होते.एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले. थोड्यावेळाने कुत्रा ब्राम्हणाच्या प्रेतापाशी गेला. त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच  भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली आणि यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूत विमान घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने  ब्राम्हणाला शिवलोकी नेले. भस्म  हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्म्य अवर्णनीय आहे. ब्रह्मराक्षसाने  भस्मधारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवांनी शंकराने देवांना जो  भस्ममहिमा सांगितला होता तो ब्रह्मराक्षसाला सांगितला.," वाळलेले गोमय जाळून  मिळालेले  भस्म सर्वोत्तम होय.ते भस्म शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळाच्या खालून वर असे उभे लावावे. नंतर मस्तकाभोवती लावावे. तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे. याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात. मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे. अशाप्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रीयांशी गमन, मदिरापान, अभक्ष्यभक्षण, गोहत्या, ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात. वामदेवाच्या तोंडून भस्ममाहात्म्य ऐकताच ब्रह्मराक्षस दिव्यरूप पावला.एक दैदिप्यमान विमान येऊन त्याला शिवलोकी घेऊन गेले  तेथे तो शिवस्वरूप होऊन राहिला.

भस्मधारणेचे  महात्म्य वर्णन करणारी अजून एक कथा सूत पुढे सांगतात.

शबर दांपत्याचा उध्दार.
सूत सांगतात,जो श्रद्धेने भस्मधारण करतो त्यावर कायम शंभोची कृपादृष्टी असते. पांचाळ देशाचा अति पराक्रमी राजा सिंहकेतू एकदा आपल्या सैन्यदलासह अरण्यात शिकारीसाठी गेला होता.काही भिल्लही त्याच्याबरोबर होते. ते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिल्लाला पडके शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते. ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा म्हणाला, "हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे. त्याचा देखावा नको." भिल्ल  म्हणाला, "महाराज मी हे शिवलिंग घरी नेतो पण त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही समजावून सांगा." राजाने त्याला पूजेचा साधा विधी सांगितला आणि पुढे म्हणाला शंकराला चिताभस्म अतिशय प्रिय आहे. रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम. निष्ठावान शिवभक्त असतात ते शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात. ही गोष्ट राजांनी माहितीसाठी म्हणून सांगितली. कारण रानावनात राहणाऱ्या भिल्लास  रोज नवे चिताभस्म न मिळून त्याची पंचाईत होईल म्हणून राजाने आधीच भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला होता पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण चिताभस्म अर्पण करूनच नित्य पूजा करायची असे ठरवले. एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे पती-पत्नी शंकराची नित्यपूजा करू लागले. भिल्ल नगरातील स्मशानातून  रोज नवे चिताभस्म घेऊन येऊन शंकराला वाहायचा. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येई आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्तवन करीत असत. अशाप्रकारे कित्येक दिवस त्यांचे पूजन चालले होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहण्याचे ठरविले. त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही. त्यामुळे तो निराशेने घरी आला त्यावर शबरीने भिल्लाला मी स्वतः दहन करून घेते  तेच चिताभस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांबपूजन करा असे सांगितले आणि शंकराचे स्मरण करून तिने स्वत:च्या वस्त्रांना अग्नी लावला. ती अग्नीत जळून भस्म झाली. आपल्या आराध्य दैवतेच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले. चिताभस्म घेऊन भिल्ल पूजास्थानी आला आणि आसन मांडून त्यांनी शंकराची पूजा केली. त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला. शबराचा एक नियम होता तो शिवपूजेतून कधीही उठत नसे. त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला की आपली पत्नी आज हयात नाही याचे त्याला स्मरण नव्हते. तो आपल्या पत्नीला सवयीने हाका मारून नैवेद्य  आणण्याविषयी  सांगू लागला. तर काय आश्चर्य हाकेसरशी पत्नी धावत आली. ती अप्सरांप्रमाणे दिव्य रूप झाली होती. त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन करून मनोभावे स्तवन केले. शबराचे रूपही पालटून तो शिवभक्त शबर शंकरासारखा दिसू लागला होता. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून शिवलोकी नेले.  हे वृत्त सिंहकेतुला कळताच त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला मी त्या शबराला  'चिताभस्माने शिवपूजन कर.' असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले. धन्य धन्य तो शबर! धन्य धन्य ती शबरी! धन्य त्यांचा निस्सीम भाव! एकनिष्ठ भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं. या घटनेतून प्रेरणा घेऊन सिंहकेतू राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण, शंकराचे भजन पूजन, शिवाप्रित्यर्थ सोमवार, प्रदोष, शिवरात्र व्रतांचे आचरण, दानधर्म करणे, सन्मानाने वागणे यात धन्यता मानू लागला. त्यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्याही जन्माचे कल्याण झाले व अंती तो शिवलोकी गेला.

असा हा शिवमहिमा अपरंपार आहे.
 
                                                            ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती:  या अध्यायाच्या पठणाने पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील. पूर्वपापनाश होईल

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...