श्री शिवलीलामृत कथासार अध्याय तेरावा
दक्षयज्ञाचा विध्वंस,त्रिपुरदहन,शिवपार्वती विवाह,स्कंदाचा जन्म,तारकासुराचा वध.
श्रीगणेशाय नमः।।
दक्षयज्ञाचा विध्वंस.
महामुनी सूत म्हणाले त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले होते पण शंकर त्याचा जामात असूनही त्याने शंकराला बोलावले नाही. तो शंकराची अहोरात्र निंदा करायचा. दक्ष शिवनंदा का करीत असे? एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला. तेव्हापासून तो शंकराची निंदा करू लागला. दक्षाची कन्या दाक्षायणी ही मात्र मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट कैलासावर पाहत होती. पण बोलावले न आल्यामुळे ती उदास झाली. ती शंकराला म्हणाली,' घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे मी स्वतः तिथे जाईन.' शंकराने तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली. इतक्यात तेथे देवर्षी नारदांचे आगमन झाले. ते म्हणाले,' तुला तेथे जावेसे वाटते ना मग जा. पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे? ' तेव्हा दाक्षायणी काही भूत गणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेली. दाक्षायणीला पाहून यज्ञमंडपात सर्वांना आनंद झाला पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या. दाक्षायणीच्या आई व भगिनींनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. दक्ष आणि त्याचा परिवार हेतूपुरस्पर दाक्षायणीचा म्हणजे साक्षात आदिमायेचा अपमान करीत आहे हे सर्वांच्या लक्षात आले. आता काय होणाऱ्या कुशंकेने सर्वांना सतावले. तो अपमान सहन न होऊन तिने देहत्यागाचा विचार केला आणि धगधगत्या यज्ञकुंडात सर्वांदेखत उडी घेतली. शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडला प्रकार शंकराला सांगितला. या आत्मदहनाचे दुःखद वृत्त समजताच शंकराला भयंकर संताप आला. त्याने प्रचंड आरोळी देऊन आवेशाने आपल्या जटा उपटल्या. त्यावेळी तेथे अद्वितीय महापुरुष प्रकटला. तो प्रलयरुद्र म्हणजे वीरभद्र! शंकराचा क्रोधाग्नी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता. शंकराला वंदन करून तो एकवीस पद्मे दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला. त्याला पाहून यज्ञमंडपात भीतीची छाया पसरली. सर्व देव, ऋत्विज दाहीदिशा पळाले. त्यावेळी त्रैलोक्यात एकच आकांत झाला. चंद्र कोंबडा ,अग्नी मोर, वरूण ससा, सूर्य कपोत व इंद्र पोपट या रुपाने पळून गेले. नवग्रहही पक्ष्यांच्या रुपाने उडून गेले. वीरभद्राचे उग्ररूप पाहून अनेकांचे जीव गेले. शंकर यज्ञमंडपात घुसला, त्याने यज्ञमंडप उद्ध्वस्त करून टाकला. थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तलवार उपसून दक्षाचा शिरच्छेद केला. दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले ते वीरभद्राने पायाखाली तुडविले. दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले ब्रह्मदेव व सर्व देवांनी शंकराची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली. पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला तेव्हा वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावताच त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला. बारा वर्षे वने आणि उपवने यांच्यात संचार करून तो काशीत आला. मग तेथे सहस्त्र वर्षे तपश्चर्यामग्न राहिला.
दाक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या पार्वती म्हणून जन्म घेतला. अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नव्हती. पार्वती लहानपणापासूनच शंकराची नित्य आराधना करीत असे. कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आला व तेथील एकांतात तपश्चर्या करू लागला. तारकासुराला तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन असे तीन पुत्र होते .हे तिन्ही बंधू रोज एक हजार कमळे वाहून शंकराची पूजा करीत. एकदा एक फुल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वाहिले. पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमले अर्पण केली. त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शंकराने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले. त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी तीन पुरे त्यांना दिली. शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फारच उन्मत्त झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले. पृथ्वीवर अनंत अत्याचार केले. देव आणि ऋषी यांनी शंकराला तारकासुराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला होता त्याचे वृत्त सांगून त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शंकराने त्रिपुरासुराचे मर्दन करण्यासाठी एक दिव्य रथ मागितला. देवांनी पृथ्वीचा दिव्य रथ बनवून शंकराला दिला. त्या दिव्य रथावर शंकर आरूढ होताच तो रसातळाला जाऊ लागला.नंदीने आपल्या शिंगांनी बलपूर्वक तो वर काढला. मग शंकराने एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुरासुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला.असुरांकडे अमृताची कुंडे असल्याने ते अमृत शिंपून त्रिपुरदैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले. अमृत कुंडाचे रहस्य कळताच शंकराने मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली. अशी तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष्य करणे शंकराला शक्य होत नव्हते अशी एक हजार दिव्य वर्षे लोटली. लक्ष्य वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांच्या पापण्या न मिटल्यामुळे त्याच्या डोळ्यातून जलबिंदू पडले. त्यांचे रुद्राक्ष झाले. अंगातून घामाच्या धारा निघाल्या. त्यांची भीमा नदी झाली. त्रिपुरांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने शंकराचा जय होत नाही ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येतात त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रीयांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्राचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाठबळ संपले व दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले. शंकराने अत्यंत दैदिप्यमान असा विष्णुबाण व त्याच्या जोडीला पाशुपतास्त्राची योजना केली. शंकराने न्यासांसहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्य अस्त्र सोडताच नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुरांचा नाश झाला.सर्वांनी शंकराची अपार स्तुती केली.
तिकडे पुत्रांच्या मृत्युने भयंकर संतापलेल्या तारकासुराने देव,अप्सरा,देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधिलिखित असल्याने व शंकर वियोगाने विरक्त झाला असल्याने त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवांनी मदनाला पाचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली. मदनाने देवांची विनंती मान्य करून तो रतीसह शंकराजवळ आला. रतीने उमेच्या मनात प्रवेश केला त्याच वेळी संधी साधून मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकराला कामप्रेरित केले. शंकराच्या समाधीत विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकराने डोळे उघडले. समोर उभा असलेला मदन दिसला. शंकराने हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व प्रकटलेल्या अग्नीज्वाळांनी मदनाला जाळून भस्म केले. ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. मदनाचे दहन झाल्याने रती शोक करू लागली. तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सांत्वन करून तुझा पती द्वापारयुगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल तेव्हा तुमचे पुनर्मीलन होईल असे सांगून तिचे समाधान केले. तिकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्तर्षींनी शंकराची भेट घेऊन शंकराला उमेला वरण्याविषयी विनंती केली. तेव्हा उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटू रुपाने तिच्यापाशी आला व शंकराचा उपहास करू लागला . ते ऐकून घेऊन ती चवताळून म्हणाली. 'तू ब्राह्मण आहेस म्हणून नाही तर मी तुला चांगलीच शिक्षा केली असती.' तिचा आवेश पाहून शंकर बटू रूप टाकून निजस्वरूपात प्रकट झाला. तेव्हा शंकराचा जयजयकार करून उमेने त्याचे पाय धरले व 'तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर.' असे वरदान मागितले. शंकराने मान्य करतात ती आनंदाने घरी परतली.सप्तर्षींनी विवाहाची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी निश्चित केली. हे वृत्त कळताच देवांचा आनंद गगनात मावेना. शिवपार्वती विवाहाच्या मंगल प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती. शंकराने पार्वतीचे यथाविधी पाणिग्रहण केले.याज्ञीक कृत्ये पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली. त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला व संकल्पाने विधात्याचे वीर्यस्खलित होऊन त्यातून साठ हजार वालखिल्य ऋषी निर्माण झाले.ते पाहून शंकराला क्रोध येऊन त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला. पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले. हा विवाह सोहळा चार दिवस चालला होता. पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतला पुढे काही दिवसांनी देवांनी शंकराची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली. शंकराने मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले. त्यामुळे तो मन रूपाने कार्यरत झाला. सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते पण चार युगे लोटूनही शिवपार्वतीस पुत्र झाला नाही, तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली. देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवपार्वतीचा एकांत भंग करण्याचे धाडस होईना तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठविले. भिक्षेसाठी हाक मारताच त्याची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकराने, 'आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य दे.' असे पार्वतीला सांगितले. त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले त्या वीर्याचा काही भाग खाली पडला त्याचे तात्काळ पाऱ्यात रूपांतर झाले. पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्नीने प्राशन केल्याने तो गरोदर झाला. लज्जित होऊन रानावनात एकटाच फिरत असता त्याला एका ठिकाणी सहा कृतिका दिसल्या. अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालताच त्या गर्भवती झाल्या. हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या. तेव्हा एक चमत्कार होऊन ते साही गर्भ एकवटून सहा मुख बारा हात असलेले दिव्य बालक प्रकट झाले. कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी! जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमेच्या स्वाधीन केले व स्कंद असे त्याचे नामाभिधान केले. सर्व देवांना आनंद झाला अत्याचारी तारकासुराला धडा शिकविण्यासाठी सर्व देव एकवटले व त्याच्यावर चाल करून गेले. इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला.
स्कंदाने अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराशी युद्ध केले. युद्धात आपल्या मंत्र शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आव्हान दिले. सात दिवस अद्भूत मल्लयुद्ध झाले अखेर कुमाराने तारकासुराच्या पायाला धरून गरगर फिरवून त्याला जोराने खाली आपटले. तारकासुर मेला देवांनी कुमाराचा जय जयकार करून त्याच्यावर फुले उधळली.चौदा भुवनी आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्या विषयी आग्रह करू लागली पण आपण येथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊन लपला. पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही. दुःखाने भूमीवर अंग टाकून ती रडू लागली. कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधरणी करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो तिला म्हणाला, "जी स्त्री यापुढे माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिकमासात कृत्तिकायोग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल." पुढे ऋषी स्कंदाची भेट घेऊन म्हणाले ," पार्वती तुझी माता आहे. तुला भेटण्यासाठी ती अहोरात्र तळमळत आहे तिला वाराणशीस जाऊन भेटून ये." ती विनंती मान्य करून स्कंदाने काशीस शिवपार्वतीस भेटून आनंदित केले. मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गूढ स्थानी परतला.
।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।
फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने शिव व विष्णू याची भक्ती उपजेल. वाईट प्रवृत्तींचे निराकरण होईल.
No comments:
Post a Comment