Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा

 


       श्री शिवलीलामृत कथासार अध्याय दहावा 

                                                     शारदाख्यान

श्री गणेशाय नमः।।
सूत सांगतात,  आनर्त  देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याची मुलगी शारदा ही अत्यंत सुंदर सुशील व चतुर होती. देवरथाने पद्मनाथ नावाच्या एका  सुशिक्षित ब्राम्हणाशी तिचा विवाह ती बारा वर्षांची असताना लावून दिला. देवरथाने आग्रह करून काही दिवस मुली व जावयाला आपल्याकडे ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला असता अंधारातून परत येत असताना एक विषारी सर्प चावल्याने तो जागीच गतप्राण झाला. ही वार्ता कळताच शारदा मातापित्यांसह तेथे  धावत धावत आली व ते सर्व शोक करु लागले. पद्मनाभाच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होती.पतिच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवीत होती. एके दिवशी एक अपूर्व घटना घडली. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते.त्या दिवशी नैधृव नावाचे एक वृद्ध  तपस्वी अंध ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले.शारदेने त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजन करून आदराने नमस्कार केला तेव्हा नैधृवाने तिला आशीर्वाद दिला,' बाळा तुझे सौभाग्य वाढो!  तुला वेदवेत्ता पुत्र होवो!' आशीर्वाद ऐकताच असह्य शोकाने शारदेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपण विधवा असल्याचे ऋषींना सांगितला. नैधृवानी तिला आपल्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही असे सांगितले. माता पिता बंधू घरी परतल्यावर शारदेने घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा त्यांनी शारदेला धीर देऊन सांगितले की वरकरणी ही गोष्ट जरी अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींच्या प्रभावाने  अशक्य गोष्टीही शक्य होतात. ऋषींनी शारदेला उमामहेशव्रताची माहिती सांगितली आणि 'ओम नमः शिवाय' या षडाक्षरी मंत्राचा नित्य जप करण्यास सांगितले. तसेच तिला दिलेले व्रत सफल होईपर्यंत ते तिथेच देवरथाच्या  घराच्या अंगणात मठ बांधून राहू लागले.नैधृवांच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. उमामहेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले.कीर्तन ऐकले. जागरण केले अशाप्रकारे गुरु वचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून ती  यथविधि व्रताचरण करू लागली. शारदा शंकर व पार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप मन:चक्षुसमोर आणून ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नैधृवानी तिच्या कडून यथाविधी उद्यापन करून घेतले.त्यावेळी तिने अकराशे दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन वस्त्रालंकार व  द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व किर्तन केले मध्यरात्रीच्या समयास शारदा नैधृवांच्या जवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करीत असता साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली. मातेच्या कृपाप्रसादाने  नैधृवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नैधृव आणि शारदा यांना परमानंद होऊन दोघांनी तिला वंदन केले आणि तिचे अत्यंत प्रेमपूर्वक स्तवन केले. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. तिने शारदेला वरदान मागण्यास सांगितले. ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगून मी दिलेला आशीर्वाद पूर्ण करावा अशी विनंती केली. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषीच्या मनात असलेला सदभाव जाणून भगवती म्हणाली, ' मुनीवर पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राम्हणाची भामिनी नामक कन्या होती. तिच्या नवऱ्याला दोन स्त्रिया होत्या.हि सुस्वरूप व मृदू भाषणी असल्याने हिने युक्ती प्रयुक्तीने नवर्‍याला आपल्या अधीन करून ठेवले होते. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहात असे.भामिनीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने आज कोणीही नाही असे पाहून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण हिने त्याला झिडकारून कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण तिच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती तिचाच ध्यास घेऊन मरण पावला. तिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम लाभले नाही म्हणून तिने तिला तू विधवा होशील असा शाप दिला. हिने दिलेल्या दुःखामुळे ती मरण पावली. कालांतराने हिलाही मरण आले. भामिनी शारदा म्हणून जन्मली जार पद्मनाभ म्हणून जन्मला. त्याचे हिच्याशी लग्न लागले. पूर्वजन्मी परस्त्री वर डोळा ठेवला म्हणून त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि पूर्वजन्मी हिच्या सवतीने दिलेला शाप खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती  होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म लाभला असून तो तीनशे साठ योजने दूर द्रविड देशात आहे. त्याला भामिनीचे स्मरण असून आजही तो भामिनीचे स्वरूप आठवून तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रेमाने अंगसंग देईल  आणि त्यामुळे तिला गर्भधारणा होऊन एका पुत्रास जन्म देईल. तो पुत्र सर्वत्र शारदानंदन या नावाने प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राम्हणाला सुख लाभेल.' असे सांगून भवानी अंतर्धान पावली. भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला आणि तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले पण समाजातील लोक तिची निंदा करू लागले.

 शारदेने आणि तिच्या घरच्यांनी सर्वांना वस्तुस्थिती समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ! लोकांना तिच्या कथांवर विश्वास न बसून ते तिला दूषणे देऊ लागले. तोच आकाशवाणी झाली, ' शारदेला दोष देऊ नका ती म्हणते तेच सत्य आहे.' पण संतापलेल्या लोकांनाही ती आकाशवाणीही कपटाचा खेळ वाटत होती.  त्यात एक पुण्यवान व विवेकी वृद्ध मनुष्य होता.तो शारदेची बाजू घेऊन लोकांना समजावू लागला. ईश्वरी सत्तेचे सामर्थ्य कसे अगाध आहे आणि जगन्नाथ काय करू शकत नाही  अशा अर्थाची उदाहरणे देऊन तो लोकांना समजावू लागला. तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते पण दुर्जन ऐकायला तयार नव्हते. ते शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली,'आता जो शारदेची निंदा करील तिला पापी व्यभिचारीणी  म्हणेल त्याची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील.' पण दुर्जनांनी ऐकले नाही. त्यांनी शारदेची निंदा करताच त्यांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही शारदेला वंदन करुन त्यांनी तिची माफी मागितली. लोकनिंदा थांबली.नवमास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले.त्याने चार वेद सहा पुराणांचा सखोल अभ्यास केला. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र त्याची कीर्ती होऊन त्याला मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तो ही परम शिवभक्त असून त्यांनी आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीच्या पर्वणी शारदा पुत्रासह गोकर्ण क्षेत्री गेली होती. द्रविड देशातील ब्राह्मण जो शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता तो शारदेला तिथे भेटला. एकमेकाला पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले.शारदेला देवीने सांगितलेले वचन आठवले. देवी म्हणाली होती, 'मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल तेव्हा उमा महेश व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला देऊन हा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात चार महिने व्रतस्थ राहून त्याची सेवा कर. समागम करू नकोस म्हणजे तू शिवलोकी जाशील.' त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन करून उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही द्रविड देशात गेली तिचा पुत्र शारदानंदन मातापित्यांची शिवपार्वती समजूनच सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृ-पितृ भक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य! शिव आणि भवानी यांच्या  कृपाप्रसादाने शारदेला ते प्राप्त झाले होते. शारदेचा पती महातपस्वी आणि योगी होता.काही वर्षांनी तो निधन पावला. त्या वेळी  शारदेनेही सहगमन केले त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले.

                                                      ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती:  या अध्यायाच्या पठणाने विवाहित निपुत्रिक दांपत्याला अपत्य प्राप्ती होईल. सायंकाळी दांपत्याने सतत बरोबरच वाचावा याचा एक वर्ष पाठ करावा. 

   

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...