Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा

 

                                   

     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा 

                       पार्वतीचा भिल्लीण वेश व श्रियाळ चांगुणेची सत्वपरीक्षा.

श्री गणेशाय नमः।।

सूत मुनी म्हणाले," गजानन व षडानन  लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवित असे. गजानन तिच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोंड  मोठ्या  प्रेमाने आईच्या पाठीवरून  फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला,' हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का? ' हे ऐकून षडानन रागावून म्हणाला .' तुझे उष्टे मी कशाला घेऊ?'  षडानन वैतागून म्हणाला, 'आई, तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र? त्याचा एक दात बाहेर आहे. त्याचे कान फताडे.' ते ऐकून शंकर-पार्वती मनमुराद हसले.षडाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले, पार्वती त्याला दुग्धपान करत असता. त्याची अन्य पाच तोंडे  भूक भूक  म्हणून रडू लागली. तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला,' आई तु याच्या पाच मूखाना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार?'  त्यावर अपर्णा म्हणाली, ' तो आपल्या पित्यावर गेला आहे, त्यांना पाच मुखे आहेत. त्याला त्यांच्यापेक्षा एक मूख जास्त आहे एवढेच!' पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले. गजानन व षडानन यांचे एकमेकांवर खुप प्रेम होते. ते एकत्र खेळायचे. गप्पा मारायचे. एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावातावाने भांडायचे. मग त्यांची समजूत काढण्यात मोठी मौज यायची. एके दिवशी शंकर सिंहासनावर बसले असता पार्वतीने त्याच्या मुखाकडे पाहून त्याला विचारले, ' तुमच्या जटांमध्ये कोणत्या स्त्रीची आकृती दिसत आहे? ' त्यावर शंकराने तिला सांगितले ,' माझ्या जटांमध्ये मी जल धारण केले आहे.' आपल्या जटामधील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत  नव्हता.पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला तो चोख प्रत्युत्तर देत होता. त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली,' तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते. तुमच्यापुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम.' एके दिवशी शिव पार्वती सारीपाट खेळत असता तेथे नारदांचे आगमन झाले.शिव पार्वतीला  वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले .' नुसते खेळून काय उपयोग? काहीतरी पण लावला तर खेळायला गंमत येईल.' असे नारद म्हणाले. नारदाचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले. सातत्याने भवानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. शेवटी एक कौपिन  उरला होता. पण डाव जिंकून तिने तो ही मागून घेतला. नंदीलाही जिंकून घेतले. अशाप्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसला. दिगंबर झाला. त्यावर नारद शंकराला म्हणाले, ' देवा हे काय एका स्त्रीने तुला हरवले. तुझा महिमा बुडाला. आता तू स्वतः मायेच्या आधीन झाला आहे ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस? ' नारदांचे बोल शंकराच्या जिव्हारी लागून तो रुसून घोर अरण्यात निघून गेला. शंकर निघून गेल्यावर पार्वतीला करमनासे झाले. तिने आपल्या सख्यांसह त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण तो तिला सापडलाच नाही. अशाप्रकारे जो साधनांना आणि वेदशास्त्रास अगम्य आहे त्या शंकराला हाका मारीत जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली.शेवटी  थकून भागून सर्व अभिमान टाकून जागच्या जागी ती शंकराला शरण  गेली आणि काम झाले. पार्वतीला शंकराचे दर्शन झाले. तो हिमालयात एका गुप्त  स्थानी समाधीत निमग्न होता.

 पार्वतीने भिल्लिणीचे रूप घेतले. ती मोरपिसांची वस्त्रे नेसली.भिल्लिणीच्या रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती. अनंत ब्रम्हांडाचा माळा गळ्यात  मिरवणारी त्रिभुवनसुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली. ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या.  तिने आपल्या पदलालित्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली होती. शंकराने डोळे उघडून पाहिले. नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लिणीचे अनुपम सौंदर्य पाहून तो अक्षरशः मोहित झाला. आपले तप ध्यान साधना विसरून तो म्हणाला, 'हे लावण्यवती! तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या  सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे. मी तुझ्या आधीन झालो आहे. तू माझा स्वीकार कर.' त्यावर भिल्लीण  मिळाली, 'तुमची पत्नी पार्वती! तिच्या सौंदर्याला उपमा नाही. तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला. तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. तुम्ही कसले तपस्वी!' त्यावर शंकर मिळाला, 'मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही.' भिल्लीण म्हणाली,' माझा पती अतिशय कोपिष्ट असून त्याला जर एवढे जरी कळले कि मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकील.' शंकर म्हणाला,' पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहित आहे काय? गेल्या जन्मी संतापाच्या भारत तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती या जन्मीही तिचे गुण तसेच आहेत.' त्यावर भिल्लीण म्हणाली,'पुरे झाली तिची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात. तुम्ही गंगेला जटामध्ये लपवून तिला उच्च पद दिले. तुमची ही लबाडी लक्षात घेऊनही भवानी बिचारी गप्प बसली. आता तुम्ही तपश्चर्येच्या निमित्ताने वनात आले आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीचा गळ्यात पडू पाहत आहात हे तर तुमचे उघड कपाट आहे.' शंकर म्हणाला,' अगं अशी कठोर नको बोलू. तुला पार्वतीचे उद्योग माहित नाही. म्हणून तू तिची बाजू घेत आहेस. आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनवण्या  केल्या तरी मी कैलासात परत जाणार नाही. मी तिच्याशी बोलणारही नाही. तू नेशील तिकडे येईन.' भिल्लीण म्हणाली,' भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता? तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय  पाड! ' बोलणे संपवून नृत्यगायन करीत ती भराभर दूर जाऊ लागली. शंकर तिच्यामागे धावला. तेव्हा 'ठीक आहे, तुम्ही माझ्या घरी या मी तुमची कामिनी होईन.' असे ती शंकराला म्हणाली . ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाला त्याला कैलासावर नेऊन तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली. त्याला वंदन करून कंठात वरमाला घालून ती मूळ स्वरूपात प्रकट झाली.त्यांचे भांडण मिटले. अंबेने शंकराचे सर्व वैभव परत दिले. ' तू धन्य आहे. तू मला परत आणलेस त्यातच तुझे प्रेम दिसून येते. नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे.' असे म्हणून शंकराने पार्वतीचे कौतुक केले.

श्रियाळ आणि चांगुणेची सत्वपरीक्षा.

सूत म्हणाले, ' एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकराच्या भेटीस आले. नारद म्हणाले, ' विश्वनाथा कांती नगरात राहणाऱ्या श्रियाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे. तो विचारशील, उदार, सुशील, सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे.अतिथीला  इच्छाभोजन देऊन तो सन्मान करतो.' ते ऐकून शंकराला श्रियाळाबद्दल कौतुक वाटून त्यांनी त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. शंकराने अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे  रूप घेतले व तो श्रियाळाच्या दारी आला.श्रियाळ व त्याची पत्नी चांगुणा यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्याची आसनावर बसवून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्याला त्याची इच्छा विचारली. तेव्हा अतिथीने मला नरमांस खाण्याची इच्छा आहे. पण एखादा चोर किंवा विकत घेतलेला मनुष्य याचे नरमांस मला अजिबात चालणार नाही. तेव्हा श्रियाळ व चांगुणेने त्याला स्वतःचे नरमांस देण्याची तयारी दाखविली.तेव्हा, 'तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालविल?'असे अतिथीने विचारले. त्यावर त्यांनी अतिथीला, 'आम्ही काय करावे?' असे विचारले. तेव्हा अतिथीने, ' मला तुझ्या पाच वर्षाच्या मुलाचे  मांस खाण्यासाठी दे .' असे सांगितले. त्यावर मोह, ममता  दूर सारून ते दोघे या गोष्टीस तयार झाले व त्याने अतिथीस चिलयास घेऊन जाण्याविषयी विनंती केली. त्यावर अतिथी रागावून म्हणाला,' मला तुम्ही त्यांचे मांस  स्वतः शिजवून खाऊ घाला. पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्र वियोगाने व्यथित होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जाईन.' चांगुणेने ते मान्य केले व चिलयास बोलावून सर्व प्रकार सांगितला. तेव्हा चिलया या गोष्टीस तयार झाला. तो म्हणाला, ' सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसाच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल.' ते ऐकून चांगुणेला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले. तिने सर्व मोहमाया दूर सारून मन कठोर करून त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले. व त्याच्या देहांचे मांस शिजवून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली. आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते. अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट आधीच जाणल्याने  तो रागाने निघून जाण्यासाठी उठला. ते पाहून श्रियाळ आणि चांगुणा यांनी त्याचे पाय धरले. तेव्हा अतिथी परत येऊन म्हणाला,' तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले? ते शिजवून का वाढले नाही?' त्यावर चांगुणा मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली.  अतिथी म्हणाला,' ते उखळात घालून माझ्या देखत कांड. रडशील तर याद राख.' चांगुणेने तेही मान्य केले. शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते कांडत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तुझ्या मुखावर मला जराही खंत दिसता कामा नये असेही बजावले. सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुणेने तेही मान्य केले. पुत्राचे  मस्तक कांडताना चिलयाचे गुणवर्णन करणारे गाणे ती गात होती. मस्तक कांडून झाल्यावर तिने तेही शिजवले व ताट मांडून आतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली. त्यावर अतिथीने श्रियाळास पंक्तीत बसण्यास सांगितले. आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने श्रियाळाचे सर्वांग शहारले. चांगुणेने त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दांनी समजाविले. तिने त्याचे ताट वाढून आणले. त्यावर अतिथीने चांगुणेस भोजनास बसण्यास सांगितले. ती जेवायला बसली इतक्यात अतिथीला  काय वाटले कोणास ठाऊक अचानक अतिथी उठला व निपुत्रिकांच्या घरचे अन्न मी  घेणार नाही असे म्हणू लागला. ते ऐकताच श्रियाळ व चांगुणा यांचा कंठ दाटून आला. 'स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अर्पण केला आता निपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न  नको म्हणता त्याला काय म्हणावं? तुम्ही किती अंत पाहणार आहात?' ती गहिवरून रडू लागली व म्हणाली,' महादेवा माझे सत्व बुडाले. माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला.' तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली  नगरजन चिलयाची आठवण काढून शोक करु लागले. देवांनी आकाशात दाटी केली. प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगुणेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथि म्हणाला,'चांगुणे  तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे.' चांगुणा म्हणाली,' मला निपुत्रिक म्हणून लोक हिणवतील तेव्हा हा कलंक कृपया धुऊन काढा.' अतिथी  म्हणाला,'तू चिलयाला हाक मारून बोलाव तो धावत येईल.' तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुणेने  चिलयाला मोठ्याने हाक मारली. तर काय आश्चर्य! चिलया धावत धावत घरात आला. त्याचक्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाला.  श्रियाळ व  चांगुणा यांनी आपल्या आराध्य महादेवांच्या चरणावर लोळण घेतली. त्याने चिलयाला मांडीवर बसवून त्याच्या मस्तकावर वरदहस्त फिरविला. या मंगल प्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली.श्री शिवकृपेने श्रियाळ व  चांगुणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली.शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले.  श्रियाळ व  चांगुणा यांच्या  पुण्याईने कांतीनगरात  सौख्य नांदू लागले तेथे सर्वांचे कल्याण झाले.'

शिवलीलामृताचा हा चौदावा अध्याय म्हणजे.चौदा विद्यांचे सार आहे.या ग्रंथाचे श्रवण पठण करता आयु,आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होते.सर्व दुःखे नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो.शिवमंत्र,रूद्राक्षधारण,रूद्राध्याय, प्रदोष,शिवरात्री,भस्म धारण ,शिवकिर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी.हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यावर शिवशंभों कृपादृष्टी करेल.

इति शिवलीलामृत समाप्त.

                                                 ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने घरात शांती नांदेल. गृहस्थाश्रम सफल होईल. अतिथी प्रसन्न होईल.

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...