Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा

 


     श्री शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा  

                                                       भद्रायू आख्यान

श्रीगणेशाय नमः।।
सूत सांगतात,ऋषभाने भद्रायूस नीतिधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच ,रूद्राक्ष धारण,भस्म धारण शिकवले. तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला.त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखीत खड्ग दिले. निजकृपेने बारा हजार हत्तींचे बळ दिले. अनेक शुभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्धान पावला. भद्रायु आणि सुमती श्रीगुरु ऋषभाचे  नित्य स्मरण करून त्याचा उपदेश वचनांना अनुसरून वागत.काही वर्षे लोटली. दाशार्ह देशात शत्रूने भयंकर धुमाकूळ घातला ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू युद्धास सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला पण शत्रुच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्याचे सर्व प्रयत्न थिटे पडले. त्याचा दारूण पराभव झाला. वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहात झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायु चवताळून उठला. क्षात्रतेजाने तळपू लागला. त्याने श्रीगुरूंचे स्मरण करून शिवकवच धारण केले. शंख खड्ग घेतले व सुमतीचा आशीर्वाद घेऊन तो युद्धास निघाला. भद्रायु आणि पद्माकर पुत्र सुनय हे दोहे पराक्रमी कुमार वज्रबाहूच्या सुटकेसाठी युद्धभूमीवर धावत गेले .भद्रायु आणि सुनय दोघांनीही शत्रूवर अविरत शरवृष्टी  केली. गुरूंनी शिकवलेली एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे  त्यांनी शत्रूवर योजली आणि  शत्रुपक्षात भयंकर संहार घडविला. या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध चापल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला. भद्रायुच्या घातक शरवृष्टीमुळे शत्रू अगदी जर्जर झाला. आपल्या सैन्याची ही दुरावस्था पाहून हेमरथ चवताळून भद्रायुवर चाल करून गेला. हेमरथ महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्रायुने  शिवयोग्याने दिलेले खड्ग बाहेर काढले. ते खड्ग पाहून हेमरथाचा धीर सुटला. तो उरल्यासुरल्या सैन्यासह पळून जाऊ लागला. ते पाहताच भद्रायुने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले आणि वस्तऱ्यासारख्या धार असलेल्या बाणाने त्याचे डोके पाच ठिकाणी भादरले. अर्धी मिशी भादरली. दाढीही कापली. अशाप्रकारे त्याला पुरता विद्रूप करून टाकले. प्रजाजनांना धीर देऊन त्याने सर्व प्रकारचे साहाय्य केले आणि प्रधानासह पित्याची सुटका केली त्याच्या पायावर डोके ठेवले .वज्रबाहुला रडू आवरेना. या उपकारकर्त्या मुलाचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे ते त्याला कळत नव्हते. भद्रायूने वज्रबाहुला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसवले. त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सद्गदित होऊन म्हणाला."पौरजन हो! या उपकारकर्त्याचे आभार माना." तेव्हा भद्रायुने राजाकडून आज्ञा मागून आपण तीन दिवसांनी परत येण्याचे वचन दिले आणि त्याच समयी आपण कोण याबाबत खुलासा करू असे सांगितले तसेच शत्रूला बंदीत ठेवून त्याच्यावर चोख पहारा ठेवण्यास सांगितले. त्यानंतर सुनयला बरोबर घेऊन तो रथातून निघून गेला.

भद्रायूने सुमती व पद्माकर ला वंदन करून आपला पराक्रम सांगितला. त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला. त्याच समयी शिवयोगी ऋषभ नैषध देशात प्रकट झाले व चित्रांगद व सीमंतिनीची भेट घेऊन त्याने भद्रायुच्या जन्मापासून ते आत्ताच्या पुरुषार्थापर्यंतचा सर्व वृत्तांत कथन करून त्याला आपला जावई करून घेण्याविषयी त्या दोघांस सुचविले. ते ऐकताच त्या दोघांना धन्यता वाटली. त्यांनी ऋषभाला वंदन करून त्याची पूजा केली. ऋषभाचे वचन प्रमाण मानून चित्रांगदाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठविला.विवाहाचा संदेश मिळताच लग्नसंबंधित सर्व तयारी करून पद्माकर आपली पत्नी पुत्र सुनय, सुमती, भद्रायु, आप्त, इष्ट, मित्र नगरजन व सेवकवर्ग यांना बरोबर घेऊन नैषध देशात गेला. भद्रायुला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी कीर्तीमालिनीच्या भाग्याचे मनःपूर्वक कौतुक केले. चित्रांगदाच्या निमंत्रणावरून अनेक राजे त्या विवाहास उपस्थित होते. वज्रबाहूही सहपरिवार आला होता. भद्रायुला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला. भद्रायूने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली आणि शिवयोगी ऋषभाच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासनेने मी व माझी आई तरलो. आजचा सुदिन हा त्याच्याच प्रसादाने आम्हाला पहावयास मिळत आहे असे सांगितले. भद्रायुने सर्व इतिहास सांगून सुमतीची व त्याची भेट घडवून दिली. तिला पाहून वज्रबाहू फारच लज्जित होऊन स्वतःचीच निंदा करू लागला. तिलाही मागील दुःखाच्या आठवणीने रडू कोसळले. ती शिवयोगी ऋषभाला कृतज्ञतापूर्वक नमन करू लागली. वज्रबाहूने तिच्या या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांचे बोलणे संपताच भद्रायुने धावत जाऊन पित्याचे पाय धरले तेव्हा वज्रबाहूने अत्यंत जिव्हाळ्याने भद्रायुस हृदयाशी धरले.वज्रबाहूने किर्तीमालिनी व भद्रायुला  आपल्या अंकावर बसवून वात्सल्याने हात फिरविला. सर्व राजांना भद्रायुचे चरित्र समजले शिवोपासनेचे महात्म्य कळले. भद्रायूने पद्माकर आणि सुनय यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला.  ठरलेल्या शुभमुहूर्तावर भद्रायु आणि कीर्ती मालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला वज्रबाहू आपल्या मुलाला, सुनेला, सुमतीला, पद्माकरला व सुनयला घेऊन विदर्भ देशात परतला. सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले. सर्व शत्रूंना आपले मांडलिक करून त्यांचा वार्षिक करभार निश्चित करून सोडून दिले. भद्रायुला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयातील केदार क्षेत्री गेला व तेथे दृढनिष्ठेने ते दोघेही शिवोपासना करू लागले.

 भद्रायुने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला होता. तो आणि किर्तीमालिनी श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत. एके दिवशी ते दोघे वनविहारासाठी गेले असता भद्रायुला एक ब्राह्मण दाम्पत्य जिवाच्या आकांताने ओरडत धावत असलेले दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता.ब्राह्मणाने भद्रायुला आपल्या पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविण्याविषयी विनंती केली.  भद्रायु धनुष्यबाण सावरून लगबगीने धावला तेवढ्यात  वाघाने ब्राह्मणी वर झडप घालून भद्रायुच्या डोळ्यादेखत तिला उचलून नेले.भद्रायुने  त्याच्यावर अनेक बाण सोडले पण ते अंगात रुतुनही वाघ ब्राह्मणपत्नीला घेऊन अरण्यात दिसेनासा झाला. ब्राह्मणाला दुःख सहन होईना. तो आक्रोश करून भद्रायुचा धिक्कार करू लागला. त्याचा आक्रोश पाहून भद्रायु म्हणाला,"कृपा करून मी तुला हवे ते देतो तुझे लग्न लावून देतो,राज्य हवे तर तेही देतो पण दुःख करू नको." ब्राम्हणाने आपली पत्नी आणून देण्याविषयी हट्ट धरिला. त्यावर भद्रायु म्हणाला," तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो." त्याचे सत्त्व पाहण्यासाठी ब्राम्हण म्हणाला, "ठीक आहे. तू मला कीर्तीमालिनी दान म्हणून दे." भद्रायुने त्या ब्राम्हणाला कीर्तीमालिनी संकल्पपूर्वक दान दिली. दानविधी पूर्ण होताच ब्राम्हण कीर्तीमालिनीसह अदृश्य झाला.त्यावर भद्रायूने अग्नी प्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले. श्रीगुरूंचे स्मरण करून अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरुपदिष्ट मंत्राचा जप करून तो अग्नीत उडी टाकणार तोच अग्नी फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतीसह प्रकट झाला. दशभुज शंकरांनी भद्रायुला आलिंगन दिले व म्हटले, "तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते मागून घे." भद्रायुने ब्राह्मणाची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकराची विनंती केली.तेव्हा शंकराने ही आपलीच माया असल्याचे सांगून त्याला किर्तीमालिनी परत दिली. ते पाहून भद्रायुने शंकराला वंदन केले. याप्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली. शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सुचविले.वज्रबाहू , सुमती, पद्माकर त्याची पत्नी यांना कैलासात तुझ्या समीप स्थान दे असा वर भद्रायूने मागितला. शंकराने किर्तीमालिनीस वर मागण्यास सांगताच  तिने आपली माता सीमंतिनी व पिता चित्रांगद यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली. वरदान देऊन शिवपार्वती अंतर्धान पावले. भद्रायूने उत्तम राज्य केले. शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तीमालिनी व भद्रायु यांचे माता पिता पद्माकर वैश्य व त्याची पत्नी पुत्र सुनय या सर्वांना दिव्य विमानातून कैलास पर्वतावर नेले. भद्रायु व  किर्तीमालिनी यांनाही निजस्वरूपात विलीन करून घेतले. अशाप्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचा उद्धार झाला.

                                          
                                                        ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु.।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल.

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...