Monday, February 7, 2022

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सातवा

 



    श्री शिवलीलामृत कथासार अध्याय सातवा  

                     सुमेधा,सोमवंत.मदन व पिंगला,सुमती आणि भद्रायू कथा


श्रीगणेशाय नमः।।
सुमेधा आणि सोमवंत.

सूत सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे दोन वेदशास्त्रसंपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत. वेदमित्र याचा पुत्र सुमेध व सारस्वत याचा पुत्र सोमवंत हेही जिवलग मित्र होते.त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही मुखोद्गत केले होते. ते सोळा वर्षाचे झाल्यावर पितृआज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखविण्यासाठी  राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवून त्या दोघांना पतीपत्नी बनून सिमंतिनीकडे जाण्यासाठी सांगितले, ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळरुप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे  तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेन आणि  मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन. ते ऐकून दोघेही ब्राह्मणकुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा देण्यासाठी तयार केले.
 राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंताला स्त्रीवेष दिला. सीमंतिनीचे सोमवारी सायंकाळी शिवपुजन चालले असताना हे दोघे ब्राह्मणदाम्पत्याचा रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती तिने हे दोघे पुरुष असल्याचे तात्काळ ओळखले.  पण तसे भासवू  न देता त्या शिवभक्त पातिव्रतेने  त्या दाम्पत्याची शंकर-पार्वती समजून पूजा केली. त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रव्यदक्षिणा व वस्त्रालंकार देऊन सन्मानाने निरोप दिला.

सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती.त्यामुळे नैषधात त्यांना चांगलाच द्रव्यलाभ झाला होता तसेच आता राजाकडूनही द्रव्यरूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते आनंदाने मार्गक्रमण करीत होते.सीमंतिनीने पूजा केल्याने स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले.अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली.स्त्रीवेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामपूर्तीची याचना केली. त्याचे बोलणे ऐकून सुमेधाने त्याला झिडकारले. स्त्री झालेल्या सोमवंताने  त्याला आपण स्त्रीरूप  झाले असल्याचे सांगताच  सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सुमेध विवेकी होता त्याने स्त्रीवेशधारी सोमवंतला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला.सोमवंताच्या मातापित्यांना हे ऐकून धक्का बसला.सारस्वत ब्राम्हण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतिनीची उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने विद्वान ब्राम्हणांना पाचारण करून मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले पण ब्राम्हणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजांनी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सात दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला .त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले ती म्हणाली,"सीमंतिनी महान पतिव्रता प्रमुख शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे.सोमवंताला स्त्रीरूपच राहू दे.  त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दांपत्यास दैवी गुणसंपन्न,वेदज्ञ  एक पुत्र होईल." देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले होते. देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळविले  पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला अंबिकेच्या  वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी! धन्य तिची शिवभक्ती! तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही.

मदन व पिंगला यांची कथा.

सूत पुढे शिवमहात्म्यपर आणखी एक कथा सांगतात, अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण रहात असे तो अत्यंत कामूक होता. पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला.तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा, मातापित्यांचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे.मद्यमांस सेवन करी अहोरात्र त्या वेश्येशी विलास करत असे.त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोध्दारासाठी भूलोकी संचार करत होता.तो महान शिवभक्त होता. एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे उत्तम स्वागत करुन यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन, वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने योग्याला संतुष्ट केले. पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना याचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याच्या अल्प सेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला.मदनाने दाशार्ह राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांच्यापोटी जन्म घेतला तर पिंगलेने सीमंतीनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव किर्तीमालिनी ठेवले.

सुमती आणि भद्रायू कथा.

सूत सांगतात,दाशार्ह राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या.सुमतीचा पुत्र राज्याधिकारी  होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला.त्यामुळे सुमती क्षतीग्रस्त झाली.  विष अंगावर फुटून तिला ठायी ठायी जखमा झाल्या तशातच ती प्रसूत झाली. जन्मलेल्या मुलांच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त व पू गळत असे. पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे.  राजाने अनेक  नामांकित वैद्यांकडून खूप औषधोपचार केले पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेऊन राणीला व  मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडुन दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबत तिचे अंत:करणही दुखावले होते. सुमती शिवभक्त होती ती सतत शंभोचा धावा करत असे.सुमती भयंकर हालअपेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस चोचीने घालत असत.वनगायी  शेपटीने बाळाला वारा  घालत असत त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे.अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरास आणले.तिची आणि नगराधिपती पद्माकर याची भेट घालून दिली.तिचे पूर्ववृत्त ऐकून पद्माकरलाही खूप वाईट वाटले.पद्माकरने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले.
त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी निराश सुमतीने शंकरावर भार सोडला. पुढे काही दिवस लोटल्यावर  सुमतीचा मुलगा मरण पावला.तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता.तिच्या शोकाला पारावर उरला नाही.तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याचे तेथे आगमन झाले. त्याही परिस्थितीत पद्माकरने त्याचे स्वागत करून पूजा केली. त्यांनी सुमतीला दिव्य निरूपण ऐकवून तिचे सांत्वन केले. ते ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले. सुमतीने धावत जाऊन त्याचे  पाय धरून त्यांना आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली. ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले.त्याने सुमतीला महामृत्यूंजय मंत्र सांगितला.त्याने महामृत्यूंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले.त्यायोगे त्या मुलामधे प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला. पूर्ण निरोगी व  सुस्वरूप झाला.सुमतीची क्षतीग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी व अप्सरांपेक्षाही सुंदर दिसू लागली. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले.गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला.ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवलेव त्याला अनेक शुभाशीर्वाद देऊन तो पृथ्वीवर राज्य करील असे भविष्यही वर्तविले.तसेच सुमतीला तो राजपुत्र असल्याचे कोठेही प्रकट न करण्याविषयी सूचना दिली.शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावला. सुमती तेथेच राहिली. शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत असे. त्यानंतर भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला.  सुमती व भद्रायूने धावत जाऊन  त्याचे पाय धरले. अश्रूंनी त्याचे चरण धुतले. आदराने  घरात नेऊन पूजन करून स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली.त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायुला नीतीधर्म समजावून सांगितला.
                                         
                                               ।।सांबसदाशिवार्पणमस्तु।।

फलश्रुती: या अध्यायाच्या पठणाने स्वभाव सुधारेल.सन्मार्ग मिळेल. अनाथ सनाथ होतील.सद्गुरूची भेट होईल.

No comments:

Post a Comment

श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा

                                               श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पंधरावा                              कवीचे निवेदन, शंकराचार्य आ...